दोघांचा मृत्यू तर दोघे सुरक्षित
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यात वारंवार सर्पदंशाच्या घटना घडून काही नागरिकांचा मृत्यू होत असताना नुकतेच पुणे जिल्ह्यातील चौघा सर्पमित्रांना सर्पदंश होऊन दोघांचा मृत्यू तर दोघांना जीवनदान मिळाल्याच्या घटना समोर आलेल्या असताना सर्पमित्रांना दंश होत असल्याने नागरिक भयभीत होत सर्पमित्रांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
जिल्ह्यातील बारामती येथील सर्पमित्र विजय यादव यांना दि. 15 ऑगस्ट रोजी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान चार दिवसांत विजय यादव यांचा मृत्यू झाला. त्याचदरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितील शेलकर याला नागाचा दंश झाला.
मात्र, त्यांच्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा झाला. ही घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा वन्यजीव सर्परक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यास नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या तिघा सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना ताज्या असतानाच शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांना शिक्रापूर येथे साप पकडताना अतिविषारी घोणसने दंश केला.
त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, दंश झालेले चारही सर्पमित्र कोणतीही सुरक्षितता न बाळगता साप पकडण्याचे काम करीत होते. तर सर्पदंश झालेल्या चौघांपैकी गणेश टिळेकर याला यापूर्वी तीनवेळा सर्पदंश झालेला असून देखील कोणत्याही सुरक्षिततेविना मोठ्या आत्मविश्वासाने साप पकडले.
सापाबाबत जनजागृती करावी
सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे म्हणाले की, सर्प पकडण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, तसेच सर्प पकडण्यासाठी स्टिकचा वापर करावा, त्या सर्पाबाबत किंवा प्राण्याबाबत आपण रिस्पेक्ट देणे गरजेचे आहे. या पकडलेल्या सापाबाबत जनजागृती करावी, साप पकडल्यानंतर तो लोकांना हातळून दाखवू नये. विशेषतः सर्प पकडण्यासाठी जाताना तोंडात गुटखा, नशापाणी न करता जावे यामुळे सर्प पकडणाऱ्या व्यक्तीचे मन विचलित होतात. दुर्घटना घडतात, असे त्यांनी सांगितले.