पुणे -दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी सातवरून दुपारी चार करण्याच्या निर्णयावर पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ आणि भाजप शहर व्यापारी आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. मदत करायची सोडून व्यापाऱ्यांना का संकटात टाकण्यात येत आहे? व्यापाऱ्यांनी जगायचं तरी कसं? असे प्रश्न दोन्ही संघटनांनी विचारले आहेत.
व्यापाऱ्यांमुळे करोना वाढतोय, अशी माहिती नाही. प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत नाही. महापालिका ही मदत देऊ शकते. राज्य सरकार आणखी मदत करू शकते. परंतु, मदत कोणतीही नाही आणि दुकानांच्या वेळा कमी करत आहात? नियम पाळून व्यवसाय केला तरी दंडाच्या पावत्या फाडल्या जात आहेत. हॉटेल, केटरिंग, मंडपवाले इत्यादी व्यवसाय ठप्प झालेत. सरकारने व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा.
– सचिन निवंगुणे, अध्यक्ष,पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ
दुकाने 4 वाजता बंद केल्याने करोना वाढायचा थांबणार आहे का? व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासून करोनाविरोधातील लढाईत सहकार्य केले आहे. आवश्यक त्यावेळी दुकाने बंद ठेवली. परंतु, व्यापारी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत, तरी निर्बंध का लावताय? व्यापाऱ्यांनाही करोनाची काळजी आहे. त्यांनाही सुरक्षित राहायचं आहे. त्यामुळे दुकानांमध्ये नियम पाळताहेत. व्यापाऱ्यांचे आता आर्थिक नुकसान होता कामा नये. सरकार मदत करायची सोडून व्यापाऱ्यांना संकटात ढकलतेय.
– महेंद्र व्यास, अध्यक्ष, पुणे भाजप व्यापारी आघाडी