नगर – मुसळधार पावसाने शनिवारी नगर शहर जलयम झाले. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकांत पाणी साचले होते. उपनगरातील अनेक घरांत पाणी शिरले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पावसामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली होती. तब्बल दोन तासाहून अधिक काळ सांयकाळी पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरून आले होते.
शनिवारी सांयकाळी पावणे पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दोन तासाहून अधिक काळ पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे दिल्लीगेट, चितळे रस्ता, माळीवाडा, पटवर्धन चौक, सर्जेपुरा, प्रेमदान चौक, प्रोपेसर कॉलनी चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनांची गती मंदावली होती. नगर शहरातील बहुतांशी रस्ते पाण्यात गेले होते. महापालिकेने गटारी, नाले, ओढे साफ न केल्याचे पितळ यावेळी उघडे पडले. शहरातील गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले. उपनगरातील नागरी वस्तीत नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले. मोकळ्या जागी तळी साचली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. घरात, अंगणात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपार्टमेंटमधील तळघरातही पाणी साचले होते.
पावसाने अचानक हजेरी लावल्याने किरकोळ विक्रेते, हातगाडीचालकांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर स्टॉल लावले आहेत. आरास साहित्य विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. पावसामुळे त्यांची धावाधाव झाली.
सलग दुसऱ्या दिवशी नगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पाईपलाईन रस्ता, गुलमोहर रस्त्यावरील नरहरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नसल्याने खड्ड्यात पाणी साचले आहे.त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेत वाहने चालवावी लागतात.
गणेश मंडळ कार्यकर्त्यांची धावाधाव
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच कोलमडल्याने गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अजूनही काही मंडळांकडून देखाव्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची त्रेधातिरपीट उडाली.
जिल्ह्यात देखील पावसाची जोरदार बॅटींग
जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. विशेषत3 पारनेर, श्रीगोंदा, नगर या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बीच्या आशा आता चांगल्या पल्लवीत झाल्या आहेत. खरीप हातातून गेले मात्र आता अपेक्षा असलेल्या रब्बीसाठी बाप्पासह गौरींच्या आगमनाने पावसाचे ही आगमन झाले आहे.
सात मंडलात अतिवृष्टी
शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यात सात मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सुपा – 109, पारनेर – 65, पळसी- 98, सात्रळ – 82, देवळाली- 66.5, धांदरफळ – 85.3, साकूर-83.3 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी
नगर- 28.9, पारनेर- 56, श्रीगोंदा- 19, कर्जत- 6.5, जामखेड- 9.4, शेवगाव- 11.3, पाथर्डी- 25.8, नेवासा- 27.9, राहुरी- 53, संगमनेर- 44, अकोले- 38, कोपरगाव- 27, श्रीरामपूर- 22, राहाता- 29.2 पावसाची नोंद झाली आहे.