नागपूर – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी ‘संघर्ष यात्रा’ काढली होती. खारपाणपट्ट्यातील 69 खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या विरोधात ही यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर खाऱ्या पाण्याचा टँकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उभा करणार असल्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. मात्र नितीन देशमुखांना नागपूरच्या वेशीवर ताब्यात घेतले. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला का तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे का? पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी याच फडणवीस यांच्या भाजप पक्षाने राज्यात आणि देशात राजकारण केलं होतं.”
“पण आता खारघर येथील कार्यक्रमात 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधीलघटनेवर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का? त्यांच्यात मन नाही का?” असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, “या घटनेतील मृत लोकांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले असून हे लोक उपाशी होते. त्यांच्या पोटात पाणी सुद्धा नव्हतं. त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय या सरकारने केली नव्हती. इतकं निर्दयी हे सरकार आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही”.
काय आहे नेमकं प्रकरण ?
महाविकास आघाडी सरकार असताना खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर तालुक्यातील 69 गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यासाठी वन धरणातील पाणी 69 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्यात आले. पण, याला तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींनी ही योजना रद्द करण्यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. फडणवीसांनीही या पाणी पुरवठा योजना रद्द केली. यावरून आता नितीन देशमुखांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.