नाशिक – नाशिक येथे आज झालेल्या शास्रार्थ सभा वादात अडकली असून अद्यापही वाद कायम आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली सभा गोंधळानंतर गुंडाळण्यात आली. याप्रसंगी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.
नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. हा वाद मिटवण्यासाठी नाशिक व कर्नाटक येथेही किष्किंदा नगरीचे साधू महंतांनी शास्रार्थ सभेचे आयोजन केले होते. मात्र सकाळी सभा सुरु होण्यापूर्वीच बंद पडली. या ठिकाणी साधू महंतांकडून बसण्यावरून वाद रंगला. परिणामी काही काळ सभा थांबविण्यात आली. यावर रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य यांनी देखील दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अखेर काही वेळांनंतर सभास्थळी अनेक साधू महंत उपस्थित झाले. साधू महंत, लोक प्रतिनिधी आदींनी उपस्थिती दर्शवत हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी एकत्र सभा सुरु झाली. मात्र सभा सुरु झाल्याच्या काही मिनिटानंतर पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आणि वादाला तोंड फुटले. त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूलाच राहून काही काळ गोंधळ झाला. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून सभा संपवली.