जळगाव – दीराने पुढाकार घेऊन करोनात विधवा झालेल्या विहिनीचा पुनर्विवाह लावून दिला आहे. विशेष म्हणजे त्याने वहिनीचा विवाह ज्यांच्याशी लावून दिला त्यांची पत्नीही करोनात मृत्यू पावली होती. दोघेही समदु:खी असल्याने त्यांच्या जीवनात आता आनंदाची नवीन पालवी फुटली आहे.
दोघेही मुळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे राहतात. या अनोख्या लग्नासाठी जळगाव-धुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुमित्रा आणि ऋषीकेश अशी या नवविवाहिताची नावे आहेत. तर नितीन पाटील असे विवाह लावण्यास पुढाकार घेतलेल्या दीराचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील मुळ रहिवासी असलेले सुमित्रा यांचे पती विनोद पाटील यांचा करोनामुळे मृत्यू झाला. कुटुंबात तरुण वहिनी आणि मुलीचा सांभाळ करताना दीर नितीन यांनी वहिनी सुमित्रा यांचा पुनर्विवाह घडवून आणण्याचा विचार बोलून दाखवला. योग्य जोडीदार शेाधणे सुरु केले.
अशातच नितीन यांना कनाशी (ता.भडगाव) येथील रहिवासी ऋषीकेश रमेश पाटील यांची माहिती मिळाली. ऋषीकेश यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी अनघा यांचाही करोनात मृत्यू झाला होता. नितीन यांनी पुढाकार घेऊन दोघांचे लग्न लावण्याचा निश्चय केला.
ऋषीकेश पाटील यांचे कुटुंबियांनी होकार दर्शवला. दोन्ही कुटुंबीयांनीही याला मंजुरी दिल्याने दोन्ही कुटुंबात आनंद संचारला. शुक्रवारी (दि 27 मे) ऋषीकेश यांचा विवाह सुमित्रा यांच्याशी अंबरनाथ येथे पार पडला. सोहळ्याला दोन्हींकडील नातेवाईक उपस्थित होते.