मुंबई – ग्राहक उपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या स्वतःचा नफा वाढवीत आहेत. मात्र या कंपंन्या ग्राहकांना उत्पादने विकणाऱ्या किराणा दुकानदारांचे मार्जिन वाढवत नाहीत. हे मार्जिन ताबडतोब वाढवून किराणा दुकानदारावरील अन्याय दूर करण्याची गरज असल्याचे मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मेदीरट्टा यांनी म्हटले आहे.
वस्तू उत्पादक कंपन्या बलाढ्य असतात. आपल्याला भरपूर नफा मिळेल अशा पद्धतीने वस्तूच्या किमती ठरवून त्या छोट्या दुकानदारांना आपल्या वस्तू उपलब्ध करतात. प्रत्येक वर्षाला या कंपन्यांच्या उलाढालीत 4 टक्के आणि नफ्यामध्ये 40 टक्केपर्यंत वाढ होते. मात्र गेल्या 30 वर्षापासून या कंपन्या किराणा दुकानदारांना जे मार्जिन देतात त्यात वाढ केली नसल्याचा आरोप मेदिरट्टा यांनी केला आहे.
फिक्की या संस्थेने या संदर्भात आयोजित केलेल्या परिसंवादात बोलतांना त्यांनी सांगितले की, कंपन्यांनी किती नफा मिळवावा आणि किराणा दुकानदारांना किती मार्जिन असावे या संदर्भातील सूत्र औपचारिक पातळीवर ठरलेले नाही. त्यामुळे अशा अवस्थेत आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या किराणा दुकानदारांची पिळवणूक होते. किराणा दुकानदारांना महाग भांडवल वापरावे लागत असताना त्यांना वस्तू विक्रीतून मिळणारा नफा मात्र वाढलेला नाही.
अशा अवस्थेत त्यांची कुचंबणा होत आहे. किराणा दुकानात काम करणाऱ्या नोकराचा पगार वाढला जातो, किराया वाढलेला आहे. मात्र मार्जिन वाढत नाही. अनेक वेळा तर मार्जिन कमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. किराणा दुकानदारांच्या संघटनेने कंपन्याबरोबर चर्चा करून मार्जिनसाठी विशिष्ट सूत्र तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कंपन्या अनेकदा पॅकेजिंगमधील वस्तूची संख्या कमी करतात आणि आपला नफा वाढवतात. मात्र तशा प्रकारची सोय किराणा दुकानदारांना नसते. आगामी काळामध्ये किराणा दुकानदारांना परंपरागत विक्रीबरोबरच डिजिटल विक्री करावी लागणार आहे. यासाठी किराणा दुकानदारांना तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हे भांडवल किराणा दुकानदारांना उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र सरकारने काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.