प्रमोद संतराम कुलकर्णी
खासगी क्षेत्रातील एक अग्रगण्य बॅंकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांच्या निधनाने बॅंकिंग उद्योगातील एक तपस्वी लोप पावला आहे. रिझर्व्ह बॅंक, बॅंक ऑफ इंडियातील अनुभव घेऊन ते अण्णासाहेब चिरमुले यांनी स्वदेशी चळवळीतून 1936 मध्ये स्थापन केलेल्या बॅंकेत 1990 ते 2000 पर्यंत सलग 10 वर्षे सेवा केली. बॅंकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली.
त्यांनी ज्यावेळी जबाबदारी स्वीकारली त्यावेळी बॅंकेत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आंदोलन चालू होते. त्यांनी अत्यंत सौहार्दाच्या वातावरणात चर्चा सुरू केली. भा. म. संघाची कार्यप्रणाली समजावून घेतली. बॅंकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांची प्रगती सामावलेली आहे व त्यामुळे बॅंकेच्या प्रगतीला प्राधान्य देणे व कर्मचाऱ्यांच्या विलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. संघटनेच्या परस्पर सहकार्याच्या भूमिकेचा उपयोग संस्थेच्या प्रगतीकरिता करता येईल याकरिता वारंवार चर्चा, वाटाघाटी, केल्या. बॅंकिंग उद्योगात चांगली सेवा ग्राहकाला कशी देता येईल याबाबतही अनेक उपाययोजना करण्यात आल्या.
1990-91 या काळातच बॅंकिंग उद्योगात केंद्र सरकारने ग्लोबलायजेशनचा स्वीकार केला. बॅंकिंगमध्ये नरसिंह कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळी बॅंकेतील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रगतीची उत्तुंग झेप घेतली. पी. एन. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत लोभस होते. कोणतेही कर्मचारी, अधिकारी यांच्याशी त्यांचा संवाद असायचा. अगदी लिफ्टमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी नवीन खाती बॅंकेत आणण्यास प्रवृत्त केले. प्रत्येकाला ते प्रगती करिता प्रोत्साहित करायचे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. कर्नाटकात जन्म झाल्याने व शिक्षण झाल्याने त्यांचे कानडी भाषेवर प्रभुत्व होते. कानडी, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषा त्यांना अवगत होत्या. रिझर्व्ह बॅंक, बॅंक ऑफ इंडियातील सेवेमुळे अनेक उच्च पदस्थांच्या समवेत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अत्यंत अल्पकाळात ते लोकप्रिय झाले. बॅंकिंगचे अभ्यासू व ज्ञानी असल्याने त्यांनी आपले विचार विविध वृत्तपत्रांतून सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवले. सेवेनंतर त्यांनी विविध बॅंकांना मार्गदर्शन केले.
शेअर्सबाबत ज्यावेळी काही समस्या निर्माण झाल्या त्यावेळी बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स घेतलेले होते. बॅंकिंग उद्योगात होत असलेले बदल लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात खासगी क्षेत्रातील बॅंकांनी एकत्र येऊन एक मोठी बॅंक निर्माण करावी हे त्यांचे स्वप्न होते. केंद्र सरकारने निर्माण केलेल्या आय.डी.बी.आय. बॅंकेला एक कमर्शियल बॅंक म्हणून पुढे काम करायचे असल्याने 230 शाखांची अद्ययावत अशी यु.वे. बॅंकेचे विलीनीकरण केले. त्या दिवशी शेअर्स भाव 24 रुपये असताना सर्व भागधारकांना रुपये 28 प्रमाणे पैसे दिले. त्याचा परिणाम म्हणून खातेदार आपुलकीच्या सेवेला मुकले असे म्हणावे लागेल. बॅंकेच्या विलीनीकरणाचेही त्यांना दुःख होते.
सारस्वत सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळावरही ते होते. बॅंकेने त्यांच्या विविध लेखांचे एक पुस्तक काढले आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी अत्यंत धीराने तोंड देऊन संस्थेवरची संकटे दूर केलेली आहेत. एकदा रेल्वेने त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग आला. गाडी स्टेशनवर थोडी लेट होणार होती. त्यांनी स्टेशन मास्तरच्या केबीनमध्ये डोकावले. कानडीमध्ये संभाषण केले. सिग्नल यंत्रणेकरिता ज्या गोळ्याचा वापर होते त्याची माहिती घेतली. म्हणजे त्यांची जिज्ञासा किती होती, हे लक्षात येते. आनंदी-पंढरपूर यात्रेतील वारीचे व्यवस्थापन कसे असते? स्वयं शिस्त कशी असते याचे अवलोकन पालखी लोणंद येथे आली त्यावेळी केले. अशा विविध घटनांची रांगच आहे.