नवी दिल्ली – सध्या युरोप दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आज फ्रांसमधील एका कार्यक्रमात भारताचे नाव बदलेले जात आहे त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द या देशासाठी योग्य आहेत आणि देशाच्या घटनेतही तसाच उल्लेख आहे.
हे दोन्ही शब्द आम्हाला मान्य आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव दिल्याने ते सरकारला रूचले नसावे. त्यामुळे कदाचित सरकार संतापले असावे. त्यामुळे आता ते देशाचे नावच बदलण्याच्या प्रयत्नात असावेत असेही राहुल यांनी यावेळी नमूद केले. आमच्या आघाडीला इंडिया बरोबरच भारत असेही नाव दिले आहे याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
राहुल म्हणाले की, या स्वरूपाच्या वादाचा काही उपयोग नसतो. लोकांच्या प्रतिक्रीया वेगवेळ्या असतात, पण लोकांना त्यांचा आवाज ऐकला जावा, त्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा असते असेही त्यांनी नमूद केले. सध्या युरोपाच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात आहेत. आज त्यांनी पॅरीसच्या सायन्स विद्यापीठात तेथील विद्यार्थ्यांनाही संबोधीत केले.