नवी दिल्ली – माझे वडील आणि महात्मा गांधी यांचे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे होते. आपण नेताजींना नियंत्रणात ठेवू शकत नाही, असे गांधीजींना वाटायचे. तर दुसऱ्या बाजूला माझ्या वडीलांसाठी गांधीजी हे प्रेरणास्रोत होते, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस पफ यांनी सांगितले.
अभिनेत्री कंगना राणावतने महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे नेताजींना ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यास तयार होते, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्याबाबत अनिता बोस पफ यांचे मत इंडिया टुडेने जाणून घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे ते दोघेही (गांधी आणि नेताजी) महान नायक होते. एकाशिवाय दुसरा काहीच करू शकला नसता. ते एकत्रित फळ होते. काही कॉंग्रेस सदस्य केवळ अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले असे सांगण्याचा प्रयत्न करतात, तसे काही नाही. नेताजी आणि त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचेही त्यात योगदान होते, हे सर्व जण जाणतातच, असे त्या म्हणाल्या.
दुसऱ्या बाजूला नेताजी किंवा आयएनएने स्वातंत्र्य मिळवले असे काही जण भासवण्याचा प्रयत्न करतात. तेही तेवढेच अर्थहीन आहे. नेताजींसह हजारो जणांची प्रेरणाच मुळी गांधीजी होते. भारतीय स्वातंत्र्यात लाखो लोकांचा सहभाग होता, अशी मांडणीही त्यांनी केली.
कंगना म्हणजे एकांगी विचाराचा मुर्खपणा
कंगनाने 1947मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे वक्तव्य केले आहे त्याबाबत अनिता बोस म्हणाल्या, हा एकांगी विचाराचा मुर्खपणा आहे.