संगमनेर – तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पठार भागासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावे आहेत. हे चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान वीजवाहक तारेचा शॉक लागून या चारही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नंतर जनार्दन आहेर यांच्यासह नागरिकांनी या चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. चारही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठार भागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतदेह झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत..!
पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले होते. या वेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.