देशातील लोकांची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे, यावर आरबीआयच्या एका अहवालात लख्ख प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकांच्या बचतीचे प्रमाण कमी होत असून त्यांच्या कर्जाचे प्रमाण वाढले आहे, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अर्थव्यवस्थेबाबत सरकार काहीही दावे करीत असले, तरी या अहवालातील निष्कर्ष सरकारला डोळे उघडण्यास भाग पाडणारे आहेत आणि त्यातून देशातील जनतेचे दैन्य वेशीवर टांगले गेले आहे. देशाचा घरगुती बचतीचा दर गेल्या 50 वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे.
ही आरबीआयने दर्शवलेली बाब धक्कादायक तर आहेच पण लोकांची नेमकी आर्थिक स्थिती काय झाली आहे याचेही दिशादर्शन करणारी आहे. सन 2023 चा घरगुती बचत तर केवळ 5.3 टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात तो 7.2 टक्के इतका होता. केवळ लोकांच्या बचतीचे प्रमाणच कमी झालेले नाही तर त्यांचे कर्ज घेण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढलेले आहे. घरातले सोने तारण ठेवून लोक कर्ज घेऊ लागले आहेत. ही सारी कशाची लक्षणे आहेत हा सवाल आता सरकारला विचारला पाहिजे किंवा सरकारच्या अर्थविषयक धोरणकर्त्यांनी त्याचा अन्वयार्थ लोकांना नीट समजावून सांगितला पाहिजे.
लोकांचे उत्पन्न जेव्हा घटते तेव्हा आपोआपच बचतीचे प्रमाण कमी होते, असा याचा सरळ अन्वयार्थ आहे. सध्या लोकांना कर्ज काढून दैनंदिन गरजा भागवाव्या लागतात आणि त्यातूनच जनतेपुढील आर्थिक अडचणींचा डोंगर दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. या भीषण परिस्थितीमुळे घरगुती स्वरूपातील कर्जाचे प्रमाण सन 2023च्या वित्तीय वर्षात जीडीपीच्या 37.6 टक्के इतके वाढले आहे. केवळ एवढेच नव्हे तर लोकांकडील मालमत्तेचे मूल्यही कमालीचे घटत आहे. सन 2021च्या आर्थिक वर्षात लोकांकडील मालमत्तेचे मूल्य 22.8 ट्रिलियन रुपये इतके होते. ते सन 2022च्या आर्थिक वर्षात घटून 16.96 ट्रिलियन रुपये इतके झाले आणि सन 2023च्या आर्थिक वर्षात आणखी घटून केवळ 13.76 टक्के इतकेच राहिले आहे. याचा सरळ अर्थ लोक कंगाल बनत चालले आहेत.
महागाईमुळे वाढलेला खर्च, वाढता आरोग्य व शिक्षणाचा खर्च यामुळे लोकांच्या एकूणच घरगुती स्वरूपाच्या खर्चाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. पण लोकांचे उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. गेल्या आठ वर्षांत लोकांचे वास्तविक उत्पन्न महागाईच्या प्रमाणात वाढलेले नाही. त्याचाच मोठा फटका लोक दरवर्षी सोसत आहेत. लोकांचा वैद्यकीय उपचारांचा खर्च गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाला, वैद्यकीय उपचारांच्या दरवाढीचे प्रमाण सन 2021च्या आर्थिक वर्षात 12 टक्के इतके होते. आशियातील सर्व देशांमध्ये भारतातील हे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही काळात लोकांच्या शिक्षणावरील खर्चही 11 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. या सगळ्या कारणांमुळे लोकांची बचत कमी होत असून त्यांच्या कर्जाचे प्रमाण वाढत आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे मूल्यही कमी होत आहे.
अर्थकारणाची ज्यांना जाण आहे त्यांना हे चांगले माहिती आहे की, लोकांचे कंझम्पशन वाढले तरच अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकते. येथे घरात येणारे उत्पन्नच घर चालवायला पुरे पडत नसेल तर लोकांचे कंझम्पशन वाढणार कसे? लोकांकडे चार जादाचे पैसे असतील तरच ते खरेदीचा विचार करू शकतात. पण आज घरगुती गरजा कशाबशा भागवण्याच्या चिंतेत असलेल्या जनतेकडून नजीकच्या काळात तरी कंझम्पशन वाढण्याची अपेक्षा करता येणार नाही. कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी या साऱ्या आकडेवारीचा आधार घेत काल सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यांनी लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला असला, तरी ही वस्तुस्थिती किती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली हा प्रश्नच आहे. सरकारकडून या वस्तुस्थितीला समर्पक उत्तर मिळण्याची अपेक्षाच करता येत नाही. कारण, सरकार आपल्याच संभ्रमित करणाऱ्या आकडेवारीमध्ये दंग आहे. लोक घरे आणि महागड्या वस्तू किती मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत याची आकडेवारी ऐकवून देशातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारली असल्याचा दावा सरकार करीत राहणार असले तरी त्यावर कोणी सहजी विश्वास ठेवणार नाही. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करणे ही सरकारची गेल्या नऊ वर्षांची सवय आहे, असा आरोप सातत्याने होतो आहे.
सरकार वस्तुस्थितीचा सामना करण्यास कचरते किंवा नेमकी वस्तुस्थिती लोकांपुढे येऊ नये याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. जेव्हा महागाई आणि बेकारीवर फारच आरडाओरड होते त्यावेळी ते जगातल्या अन्य देशांतील आकडेवारी लोकांच्या तोंडावर फेकून लोकांना गप्प करण्यात धन्यता मानत असतात. पण त्यामुळे लोकांना प्रत्यक्षात जे दैन्य भोगावे लागत आहे त्या स्थितीत बदल होत नसतो.
भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनणार, भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी होणार आणि भारत ही जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे, अशा दावेदारीचा सारा देखावा लोकांपुढे उभा केला तरी त्यांच्या दृष्टीने तो निरर्थक असतो. लोकांना अपेक्षा आहे वास्तवातल्या दिलाशाची. तो दिलासा कधी मिळणार ईश्वरच जाणे.