भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-3′ मोहिमेतील अंतिम टप्प्यामध्ये विक्रम लॅंडरने चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे लॅंडिंग केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन करायला हवे. जगातील सर्वच देशांनी भारताच्या या चांद्रयान मोहिमेची दखल घेतली असून भारताकडे आता आदराने आणि अभिमानाने पाहिले जात आहे. अशा प्रकारच्या अवकाश मोहिमा राबवण्याचा मोठा अनुभव पदरी असणाऱ्या रशियाचे “लुना25′ हे लॅंडर गेल्याच आठवड्यात चंद्रावर लॅंड होता होताच क्रॅश झाल्याचा अनुभव ताजा असतानाच भारताच्या विक्रम लॅंडरने यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभूमीवर पाऊल ठेवल्याने हा निश्चितच अभिनंदनाचा आणि आनंदाचा क्षण आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवर विक्रम लॅंडरच्या मदतीने पोहोचलेले प्रज्ञान रोवर विविध प्रकारचे संशोधन करून महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वीकडे पाठवणार आहे, जी मानव जातीच्या विकासासाठी आणि इतर अनुषंगिक गोष्टीसाठी निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या या मोहिमेचे महत्त्व जगभरातील सर्वच देशांना माहीत असल्यानेच अमेरिकेची नासा असो किंवा युरोपियन स्पेस एजन्सी, सर्वांनीच या मोहिमेसाठी भारताला मदत केली होती. कारण, भारताच्या मोहिमेमुळे चंद्राबाबत जी माहिती उपलब्ध होणार आहे त्याचा फायदा जगभरातील सर्व देशांना होणार आहे.
भारतही या माहितीची देवाण-घेवाण सर्व देशांना करणार आहे. पण यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अवकाश मोहिमांच्या बाबतीत भारताचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे, ही बाबही विसरून चालणार नाही. कारण, आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये चंद्राच्या दिशेने अनेक मोहिमा राबवण्यात आल्या असल्या तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एखादा लॅंडर उतरवण्याची मोहीम फक्त भारताने यशस्वी करून दाखवली आहे. भारताने 2008 मध्ये जेव्हा पहिली चांद्रयान मोहीम राबवली तेव्हा चंद्रावर बर्फ रूपात पाणी असल्याचे भारताच्याच मोहिमेतून जगाला कळले होते. 2019 मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या मोहिमेला चांगले यश मिळाले होते. पण तेव्हा लॅंडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरत असताना क्रॅश झाल्याने शेवटचा टप्पा पूर्ण करता आला नव्हता. 2019 च्या मोहिमेत ज्या चुका झाल्या होता त्या दुरुस्त करूनच आणि त्या चुकांना समोर ठेवूनच 2023 ची “चांद्रयान-3′ मोहीम आखण्यात आली होती. गेल्या महिन्यात 14 जुलै रोजी जेव्हा “चांद्रयान-3′ हे चंद्राच्या दिशेने झेपावले. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडणे अपेक्षित होते त्या सर्व तांत्रिक गोष्टी गेल्या कालावधीमध्ये व्यवस्थित घडल्या आहेत.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे असो किंवा इतर काही तांत्रिक विकसित बाबी असोत, सर्व गोष्टी वेळापत्रकाप्रमाणे नियोजित पद्धतीने पूर्ण झाल्या असल्याने चंद्रावरील विक्रम लॅंडरचे लॅंडिंगसुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल असे वाटत होते आणि तसेच झाल्यामुळे या चांद्रयान मोहिमेला अभूतपूर्व आणि देदीप्यमान असे यश मिळाले, असाच निष्कर्ष काढावा लागतो. या मोहिमेमुळे जगातील अमेरिका, रशिया आणि चीन या मोठ्या देशांच्या रांगेत बसण्याचे भाग्य भारताला मिळाले आहे. शिवाय चंद्राच्या दक्षिण भागावर पोहोचण्याचे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे लुना 25 हे लॅंडरसुद्धा दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार होते; पण तांत्रिक बिघाडामुळे ते लॅंडर क्रॅश झाले. साहजिकच चंद्राच्या दक्षिण भागावर पाय ठेवणारा पहिला देश म्हणून आता भारताची नोंद जागतिक पातळीवर केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही जागतिक पातळीवर आदराने नाव घेतले जाणारी संस्था ठरली आहे. अवकाश संशोधनामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून विविध अवकाश मोहिमा यशस्वी करण्यामध्ये इस्रोने आपला ठसा उमटवला आहे.
2013 मध्ये इस्रोने आपली “मंगळयान’ मोहीमसुद्धा यशस्वी केली होती. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान प्रस्थापित करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. येत्या कालावधीमध्ये “गगनयान’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. म्हणजेच चंद्रावर माणसाचे पाऊल पडावे यासाठी आता इस्रोने आपली “गगनयान’ ही मोहीम आखली आहे. याअंतर्गत तीन अंतराळवीरांना घेऊन त्यांना चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरवण्याचे नियोजन या मोहिमेमध्ये करण्यात येणार आहे. ज्या प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोच्या सर्व मोहिमा यशस्वी होताना दिसत आहेत त्या पाहता गगनयान मोहीमसुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. जे देश सध्या अशा प्रकारच्या अवकाश मोहिमा राबवत आहेत त्यांना येणारा खर्च आणि इस्रोला येणारा खर्च यामध्ये खूप तफावत आहे. अत्यंत कमी खर्चात इस्रो आपल्या अवकाश मोहिमा राबवत असते. रशियाच्या लुना 25 या मोहिमेसाठी तब्बल 16 हजार कोटी रुपये खर्च आला होता;
पण भारताच्या “चांद्रयान-3′ मोहिमेसाठी जेमतेम 700 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक छोट्या देशांचे उपग्रह आकाशात प्रक्षेपित करण्याचे व्यापारी काम इस्रोतर्फे केले जात आहे. 2019 मध्ये जी चांद्रयान मोहीम राबवण्यात आली होती त्यासाठी वापरण्यात आलेले ऑर्बिटर अद्यापही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. खरे तर त्या ऑर्बिटरचे आयुष्य फक्त दोन महिने होते; पण अजूनही ते चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. ही इस्रोच्या उच्चतंत्रज्ञान क्षमतेची साक्षच म्हणावी लागेल. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी जे स्वप्न पाहिले होते ते आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. डॉ. विक्रम साराभाई यांचेच नाव ज्या लॅंडरला दिले होते ते “विक्रम’ लॅंडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरले असल्याने ती एक प्रकारे साराभाई यांना देण्यात आलेली आदरांजलीच मानावी लागेल.
अशाच प्रकारच्या अवकाश मोहिमा राबवून त्या यशस्वी करण्यासाठी आता इस्रोशी निगडित असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचा हुरूप निश्चितच वाढणार आहे. विक्रम साराभाई यांच्यासारख्या ज्या अनेक शास्त्रज्ञांनी भारताला अवकाश मोहिमांमध्ये नाव मिळवून देण्यासाठी काही संकल्प केला होता तो आता पूर्ण होताना दिसत आहे. या दीर्घ प्रक्रियेचा भाग असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि इस्रो या संघटनेचे त्यानिमित्ताने मनापासून अभिनंदन. कोट्यवधी भारतीय आणि जगभरातील अनेक देश आता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी “गगनयान’ या मोहिमेची वाट पाहत आहेत. त्या मोहिमेच्या यशस्वितेसाठीसुद्धा इस्रोला शुभेच्छा.