आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय निश्चित आहे आणि विरोधी पक्ष विरोधी बाकांवरच बसणार आहे, असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. वास्तविक रालोआ आघाडीत ताकदीचे घटक पक्ष नाहीत. छोटे छोटे पक्ष आहेत. अर्थात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट रालोआमध्ये असून, या पक्षांकडे बर्यापैकी शक्ती आहे. परंतु एकूणात भाजपची ताकद यावेळी वाढेल व त्याचा काहीसा फायदा घटक पक्षांनाही होईल आणि पूर्वीपेक्षा अधिक जागा रालोआ आघाडीला मिळतील, असा भाजपचा आडाखा आहे. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपाला दणदणीत यश मिळाल्यामुळे, त्या पक्षात उत्साह संचारला आहे.
याउलट ’इंडिया’ आघाडीच्या आरंभीच्या उत्साहावर पाणी पडले आहे. परंतु असे असूनही, या आघाडीतील महत्त्वाचा हिस्सा असलेल्या काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, जाहीरनामा समिती स्थापन करणे, जागावाटपाच्या वाटाघाटींना गती देऊन उमेदवार निश्चिती करणे, या दिशेने काम सुरू केले आहे. वयाची ऐंशी पार केलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही नेते जोरात कामाला लागले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत जागावाटपाची बोलणी संपवावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत केली होती. इंडिया आघाडीचे काम फार संथ गतीने सुरू आहे, अशी ममतादीदींची तक्रार आहे. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसशी आघाडी करण्यास ममतादीदींनी तयारी दर्शवली आहे.
तृणमूल, काँग्रेस आणि माकप हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु प. बंगालमध्ये माकप आणि तृणमूलचे संबंध बरे नाहीत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी हे दीदींवर सातत्याने टीका करत असतात. ममतादीदी या माकप व काँग्रेसबरोबर जागावाटपाचा समझोता करण्यास तयार असल्या, तरी एकत्रितपणे राजकीय प्रचार करण्यास त्या तयार नसतील आणि आम्हाला सामूहिक राजकीय प्रचारात रस आहे, असे मत माकपचे प. बंगालचे सचिव आणि माजी खासदार मोहम्मद सलीम यांनी व्यक्त केले आहे. तसेच ज्यावेळी संसदेमधून विरोधी पक्षाच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई सुरू होती, तेव्हाच ममतादीदींनी पंतप्रधानांची भेट घेतली, याबद्दलही सलीम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अर्थात काही दिवसांपूर्वी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व बरखास्त करण्यात आले, त्यावेळी अधीर रंजन यांनी महुआ यांना नैतिक पाठिंबा दिला होता. मात्र त्याच वेळी तृणमूलशी आघाडी केल्यास प. बंगालमधील मुसलमान काँग्रेसपासून दूर जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. मध्यंतरी सागरदिघी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिंजपूर जिल्ह्यांतील बंगालीभाषिक मुसलमान हे काँग्रेसकडे परत वळू लागल्याची चिन्हे त्यावरून दिसू लागली होती. थोडक्यात, प.बंगालमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र येण्यात काही अडचणी आहेत. मात्र प. बंगालपेक्षाही महत्त्वाचे आणि देशातील सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश. तेथे लोकसभेच्या 80 जागा आहेत.
उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल म्हणजेच आरएलडी या पक्षांना एकत्र येऊन निवडणुका लढवायच्या आहेत. गेल्या मंगळवारी झालेल्या इंडियाच्या बैठकीत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी हे उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाशी आघाडी करण्यास नकार दिला. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी ’अखिलेश बिखिलेश को मैं नहीं जानता’ असे उद्गार काढून सपाला दुखावून ठेवले आहे. ’मध्य प्रदेशात तुम्ही आम्हाला असे वागवले ना, तर आता उत्तर प्रदेशात आम्ही काय करतो बघा!’ असा इशारा सपाने तेव्हाच देऊन ठेवला होता! राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आरएलडीला केवळ एक जागा दिल्यामुळे, चौधरी देखील नाराज झाले आहेत.
अर्थात एवढा हट्टीपणा करून देखील मध्य प्रदेश व राजस्थान अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये सपा आणि आरएलडी यांच्यात जागावाटपावरून तणाव निर्माण झाला. सपा दादागिरी करत असून, त्यांनी आम्हाला पुरेशा जागा दिल्या नाहीत, अशी आरएलडीची तक्रार होती. तेव्हा भाजपने एकूण 403 पैकी 255 जागांवर विजय मिळवला. सपाने 347 जागा लढवून, 111 जागी यश मिळवले. तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आणि आरएलडीने 33 जागांवर उमेदवार उभे करून नऊ जागांवर विजय प्राप्त केला. याचा अर्थ आरएलडीसारखा पक्षदेखील उत्तर प्रदेशात काँग्रेसपेक्षा अधिक वरचढ आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पुनरुज्जीवित करण्यात प्रियांका गांधी यांना यश मिळालेले नाही.
त्यासाठी त्यांना राज्यात तळ ठोकूनच काम करावे लागेल. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीदेखील आज तेथे काँग्रेसची ताकद नाही. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. त्या आधारावर यावेळी लोकसभेच्या 25 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असा काँग्रेसचा आग्रह आहे. पण सपा त्यास बळी पडेल, असे वाटत नाही. गेली तीन दशके उत्तर प्रदेशमधून काँग्रेसचे जवळपास उच्चाटन झाले आहे. फक्त 2009 मध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, तराई, मध्य अवध, पूर्व उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंड या राज्याच्या सर्व विभागांत काँग्रेसने थोडे थोडे यश प्राप्त केले होते. मात्र हे यश मिळूनही आता 14 वर्षे उलटली आहेत. या कालावधीत काँग्रेसचा उत्तर प्रदेशात धुव्वा उडालेला आहे. अशा स्थितीत त्यांना इतक्या जागा कोण देणार? सपा लोकसभेच्या 50 ते 60 जागा लढवू इच्छिते.
2019 च्या लोकसभा निवडणुकांत सपा आणि बहुजन समाज पार्टी तसेच आरएलडी यांच्यात समझोता झाला होता. त्यावेळी या आघाडीने काँग्रेससाठी आपणहून रायबरेली आणि अमेठी या दोन जागा सोडल्या होत्या. त्यातही अमेठीमधून काँग्रेसचा पराभव झाला! सपाने पाच जागांवर विजय मिळवला, तर बसपाने 10 जागी यश प्राप्त केले आणि आरएलडीच्या पदरात शून्य जागा आल्या. काँग्रेसने स्वतंत्रपणे 80 जागा लढवूनही, त्या पक्षास केवळ रायबरेलीची जागा जिंकता आली. यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीला 12 जागांवर उमेदवार उभे करण्याची इच्छा आहे. इंडिया आघाडीत बसपा नसला, तरी सपा आणि आरएलडी हे पक्ष काँग्रेसला फार जागा सोडतील, असे वाटत नाही. अशावेळी जागांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात समझोता होऊ न शकल्यास, इंडिया आघाडीच्या दृष्टीने आणखी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच आघाडीतील प्रत्येक घटक पक्षास मन मोठे करून लवचिकता दाखवावी लागेल.