जनता दल युनायटेड या पक्षाचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी रविवारी संध्याकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची आणखी एकदा शपथ घेतली आणि बिहारी राजकारणाचा एक वेगळाच रंग समोर आला. सर्वसाधारणपणे लोकशाही राजकारणामध्ये जेव्हा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलतो तेव्हा त्याचे नावही बदलते; पण बिहारमध्ये मात्र मुख्यमंत्री तोच राहतो फक्त त्याचे मित्रपक्ष बदलत राहतात. हे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हे सिद्ध करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका नितीशकुमार यांनीच बजावली आहे. कधी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपसोबत मैत्री करायची आणि कधी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत मैत्री करायची आणि मुख्यमंत्रिपदावर कायम राहायचे हा राजकारणाचा डाव कित्येक वर्षे नितीशकुमार खेळत आहेत.
पुन्हा एकदा त्यांनी तोच डाव खेळला आहे. साहजिकच बिहारच्या राजकीय इतिहासात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली, अशी नोंद नितीशकुमार यांच्या नावावर जरी झाली असली तरी अनेक वेळा त्यांनी एकाच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये नवीन मित्रांसोबत शपथ घेतली आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला अशा प्रकारचे राजकारण हवेच असते. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला आव्हान निर्माण करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचा प्रयोग समोर येत होता आणि त्यासाठी नितीशकुमार हेच पुढाकार घेत होते. ते पाहता आता तेच नितीशकुमार हेच एनडीएचा घटक पक्ष झाल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक होईल तेव्हा बिहारमधील यश भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
देशातील लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या संदर्भात तिसर्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी नितीशकुमार यांची मैत्री भाजपलाही हवी असल्याने त्यांनी पूर्वीचे सर्वकाही विसरून नितीशकुमार यांना मैत्रीचा हात दिला. खरेतर गेली विधानसभा निवडणूक नितीशकुमार आणि भाजप यांनी एकत्रपणे लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भारतीय जनता पक्ष दुसर्या क्रमांकाचा आणि नितीशकुमार यांचा जनता दल तिसर्या क्रमांकावर गेला होता. नितीशकुमार आणि भाजप यांना एकत्रपणे बहुमत असल्यामुळे त्यांचे सरकार स्थापन होणे सहज शक्य होते. पण तेव्हाच नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून लालूप्रसाद यांना जवळ केले होते. लालूप्रसाद यांनीसुद्धा आपला पुत्र तेजस्वी यांना मुख्यमंत्री होऊ न देता नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा मान मान्य केला होता.
आता त्याच लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याबरोबर राज्यकारभार करताना बरे वाटत नसल्याचे कारण देऊन नितीशकुमार यांनी भाजपसोबत पुन्हा एकदा संसार थाटला आहे. विधानसभेतील तिसर्या क्रमांकाचा राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री आणि त्याला दुसर्या क्रमांकाच्या पक्षाने पाठिंबा देणे आणि पहिल्या क्रमांकाच्या पक्षाने विरोधी बाकावर बसणे अशा प्रकारचा राजकारणाचा वेगळाच रंग आता बिहारमध्ये दिसू लागला आहे. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे राजकारण घडले होते आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती. महाराष्ट्रातील चित्रही आता बदलले असले तरी त्यापेक्षा राजकारणाचा वेगळा रंग बिहारमध्ये दिसत आहे. भाजपासाठी नितीशकुमार यांची ही मैत्री अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. एक तर या निर्णयामध्ये आपोआपच इंडिया आघाडी खिळखिळीत झाली आहे आणि त्याला काही प्रमाणात भाजपच्या डावपेचापेक्षाही इंडिया आघाडीतील नेत्यांचा हट्टीपणा कारणीभूत आहे.
इंडिया आघाडीचे निमंत्रक म्हणून नितीशकुमार यांचे नाव सुचवण्यात आल्यावरही विरोध झाल्यामुळे नितीशकुमार नाराज झाले होते. तेव्हापासूनच ते इंडिया आघाडीपासून बाजूला राहिले होते. इंडिया आघाडीचा चेहरा होऊ शकणारे नितीशकुमार, ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यासारखे नेते आपोआपच या आघाडीपासून दुरावत चालल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने भाजपसाठी ते फायदेशीरच ठरणार आहे. अर्थात, या सर्व घडामोडींकडे बिहारमधील मतदार कशा प्रकारे पाहणार आहे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. विधानसभेत सर्वात जास्त जागा जिंकून आणूनसुद्धा विरोधी बाकावर बसावे लागलेला राष्ट्रीय जनता दल हा पक्ष हा विषय जनतेच्या समोर आणून सहानुभूती मिळवण्यात किती यशस्वी ठरतो हेसुद्धा आगामी कालावधीमध्ये पहावे लागणार आहे. पण या सर्व राजकीय घडामोडी सुरू असतानाच लालूप्रसाद यांच्या कुटुंबाविरोधात ईडीची कारवाई सुरूच आहे. नोकरीच्या बदली जमीन या विषयावरून लालू यादव कुटुंबाविरुद्ध खटला सुरू असल्याने तो विषय आगामी कालावधीमध्ये चर्चेत राहणार आहे.
बिहारमधील विद्यमान राजकारणामुळे लालूप्रसाद कुटुंबाला सहानुभूती मिळणार नाही याची काळजी भाजपकडून घेतली जाईल. त्यासाठीच असे ईडीच्या कारवाईचे हत्यार वापरले जाईल. बिहारी राजकारणाचे हे वेगळे रंग आता दिसू लागले असले तरी त्याने नितीशकुमार यांची प्रतिमा मलिन होण्याचा जास्त धोका आहे, हे त्यांनीही लक्षात घेण्याची गरज आहे. कारण आता नितीशकुमार यांच्या नावावर पलटूराम हा शिक्का बसला आहे. जसा ‘आयाराम आणि गयाराम’ हा वाक्प्रचार गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय झाला आहे त्याच धर्तीवर आता नितीशकुमार यांना समोर ठेवून पलटूराम हा वाक्प्रचारही लोकप्रिय होऊ लागला आहे. नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन बिहारमध्ये सत्तेत सहभागी झालेल्या भाजपालासुद्धा नितीशकुमार यांची ही पलटूराम प्रतिमा लक्षात ठेवावी लागणार आहे.
कारण यापूर्वी किमान दोन वेळा नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली होती. ते पुन्हा तसे करणार नाही त्याची कोणतीही खात्री देता येत नाही. पण सध्या तरी भाजपसाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याने ही निवडणूक होईपर्यंत नितीशकुमार यांच्याबरोबरची मैत्री भाजप इमाने इतवारे निभावेल त्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकारणाचा वेगळा रंग दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.