मंचर, (प्रतिनिधी) – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे शेततळ्यात बुडून मृत्यु झालेल्या चारही मुलांच्या कुटुंबाना मोरया ग्रुप ऑफ कंपनीचे मालक व गंगापूर खुर्द येथील रहिवाशी उद्योजक रमेश येवले यांनी शनिवार, २५ रोजी निरगुडसर येथे जाऊन या कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार या प्रमाणे एक लाख रुपयांची रोख मदत दिली.
शुक्रवारी दुपारी निरगुडसर येथे शेततळ्यात बुडून चार बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. या घटनेची माहिती उद्योजक रमेश येवले यांना समजल्यानंतर त्यांनी निरगुडसर येथे घटनास्थळी भेट देऊन या चारही बालकांच्या कुटुंबाची भेट घेतली व विचारपूस करत त्यांना धीर दिला व या कुटुंबाना मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार या प्रमाणे एक लाख रुपयांची रोख मदत दिली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, जिल्हा समन्वयक नित्यानंद येवले, प्रतिक टाव्हरे, दत्ता वळसे पाटील, मिलिंद वळसे-पाटील उपस्थित होते. तालुक्यात कोठेही दुर्घटना घडल्यास पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी रमेश येवले नेहमी धावून येतात, असे सुरेश भोर यांनी यावेळी सांगितले.