मुंबई – “सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे खारघर दुर्घटनेच्या ठिकाणी का गेले नाही? आत्ता ते कुठे आहेत? या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची नाही, उलट त्यांनी स्वतः या प्रकरणाची जवाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपावर आगपाखड केली.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे आत्तापर्यंत 14 लोकांना जीव गमवावा लागला आहे, त्या पार्श्वभूमिवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, याआधी देखील आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रम झालेला आहे. त्यावेळी तर सर्व काही नीट झाले होते. पण जर का इतका भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करायचाच होता तर त्याचे तसे नियोजन करणे देखील गरजेचे होते.
वापरा आणि फेका हे भाजपचे वैशिष्ट्य
श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपकडून अप्रत्यक्षपणे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात येत आहे. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, वापरा आणि फेका हे तर भाजपचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या अंगलट येते, तेव्हा त्या गोष्टीचे खापर भाजप दुसऱ्यांवर फोडून मोकळे होते.
या सोहळ्यासाठी अमित शहा हे दिल्लीवरून मुंबईला आले. त्यामुळे या जमलेल्या गर्दीच्या मतांचे राजकारण त्यांना करायचे होते का? याआधी ज्यावेळी नानासाहेबांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सुद्धा लाखो लोक आले होते. पण हे लोक केवळ मतदार व्हावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता का? असा प्रश्न देखील ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.