Nagpur Accident – नागपूरमध्ये कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच गावातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला.
जखमींला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही दुर्घटना घडली.
मयूर इंगळे (२२), वैभव चिखले (३२), सुधाकर मानकर (४२), विठ्ठल थोटे (४५), अजय चिखले (४०) व रमेश हेलोंडे अशी मृतांची नावे आहेत. जगदीश ढोणे यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृत व जखमी असे सर्वजण मेंढेपठार गावातील रहिवासी होते.
हे सर्वजण नागपूरमधून एक लग्नसोहळा आटोपून पुन्हा आपल्या गावी परत जात होते. त्यांची कार भरधाव वेगात असताना सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला.