श्रीगोंदा – शेतीमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची प्रकरणे वारंवार घडत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी यंत्रणेकडे दाद मागूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेकदा समोर येते. परिणामी, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून, व्यापाऱ्यांचे फावत असल्याचे दिसून येते.
प्रामुख्याने द्राक्षे, डाळिंब, कांदा आणि भाजीपाला या शेतीमालाच्या खरेदीसाठी राज्यभरातूनच नव्हे, तर परराज्यातूनही व्यापारी येतात. अनेक व्यापारी प्रामाणिकपणे व्यवहार करीत असले, तरी फसवणूक करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. नुकतेच एका व्यापाऱ्याने श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील 22 द्राक्ष उत्पादकांना जवळपास सव्वा कोटींना फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे. शेतीमालाच्या खरेदीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे हे पहिले प्रकरण नसून यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
मात्र, अपवादात्मक प्रकरणातच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; अन्यथा बहुतांश वेळा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.परप्रांतातून अनेक व्यापारी शेतमाल खरेदीसाठी दाखल होतात. काही वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार करतात. तिसऱ्या, चौथ्या वर्षी पैसे बुडवून पोबारा करतात. तर काही व्यापारी अधिक दर देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करतात. व्यवहार करताना करार किंवा लेखी काही नसतं. व्यापाऱ्यांची खातरजमा केली जात नाही.
शेतकरी विश्वासाने अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांकडे शेतमाल सुपूर्द करतात. त्यापोटी व्यापारी कधी शेतकऱ्यांना धनादेश देतात, तर कधी निव्वळ बॅंक खात्यावर पैसे वर्ग करण्याच्या ‘शब्दा’वर देखील हे व्यवहार होतात. हा धनादेश बॅंकेत न वटल्यास अथवा ठरलेल्या मुदतीनंतरही बॅंक खात्यावर पैसे न आल्यास फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येते. शेकडो शेतकऱ्यांची अशी आर्थिक फसवणूक होते. शेतीमालाच्या खरेदीत शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
व्यापाऱ्यांकडून व्यापाऱ्यांचीही फसवणूक!
परराज्यातील व्यापारी केवळ शेतकऱ्यांचीच फसवणूक करीत नाहीत. त्यांच्याकडून काही दिवसांपूर्वी तालुक्यातील व्यापाऱ्यांना देखील कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या लुटारू व्यापाऱ्यांच्या तावडीतून तालुक्यातील व्यापारीदेखील सुटलेले नाहीत.