बिबवेवाडी, दि. 19 (प्रतिनिधी) -शुद्ध पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी संबंधीत कंपन्यांकडून “मार्केटींगचा फंडा’साठी हॉटेल चालकांचा कसा (दुर)उपयोग केला जात असल्याचे वृत्त “प्रभात’मध्ये दिले होते. पाण्याची बाटली विक्री होण्यासाठी ग्राहकांना कुपनलिकेचे पाणी पिण्यास देणे तसेच जेवणाची ऑर्डर घेताना थेट पाण्याच्या बाटल्या समोर आणून ठेवणे असे प्रकार हॉटेलात सर्रास सुरू आहेत.
आधीच हॉटेलातील जेवणावर भरमसाठी जीएसटी लावण्यात आला आहे तसेच इच्छा नसतानाही ग्राहकांकडून सर्व्हिस टॅक्सही घेतला जातो. त्यात या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांमुळे बिलात किमान 20 ते 150 रुपयांपर्यंत भर पडत आहे. याबाबत ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे, हॉटेलात येणाऱ्या काही ग्राहकांच्याही प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत नुसते आश्वासन देऊ नये. संबंधित कॅफे, हॉटेलमधील खाद्य पदार्थांचीही तपासणी करावी. ग्राहकांना शुद्ध पाणी देऊ शकत नसतील तर त्यांचे खाद्य परवाने रद्द करावेत, हॉटेल चालकांवर कारवाई झाली तरच हे प्रकार थांबतील. याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे.
– राजेश बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते
मुकुंदनगर मधील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये आम्ही कॉफी पिण्यास गेलो ते 50 रुपये एका कॉफीस दर असूनही पाणी पिण्यास मात्र बोरिंगचे वास येत असलेले देण्यात आले. तक्रार केली तर चार दिवसांपासून पालिकेचे पाणीच आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याची बाटली विकत घ्यावी लागली. सदर कॅफे मध्ये युवकांची मोठी गर्दी असते.
– महेश साळुंके, ग्राहक, बिबवेवाडी
बोरिंगच्या पाण्यात क्षार जास्त असल्याने मुतखडा होण्याची शक्यता असते. त्या पाण्याचा वास येत असेल किंवा खराब असेल तर टाइफाइड, कॉलरा, पोटाच्या आतड्यांचे गंभीर आजार होतात. पालिकेचे पिण्याचे पाणी मुबलक मिळते. काही हॉटेल चालक पाणी बाटलीची विक्री व्हावी यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतात.
– रणजित निकम, डॉक्टर, पर्वती