नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फूटीनंतर जिल्ह्यात सर्वात प्रथम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे व राहुरी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपण शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आज मुंबईत आ. तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांना धक्का मानला जात होता. जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांना हा धक्का बसला होता. परंतु आ. तनपुरे यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर लगेच आपली भूमिका स्पष्ट करून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.
आ. तनपुरे यांनी आपली भूमिका आज दुपारी मुंबई येथे स्पष्ट केली. मी कुठेही गेलेलो नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबरच राहणार आहे. माझ्या भूमिकेत कोणताही बदल नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले.
अजित पवार यांनी फोन करून बोलावून घेतले होते. त्यामुळे त्यांना भेटलो. असे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच नव्हे तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्येही अनेक ठिकाणी अस्वस्था वाढत आहे. नगर जिल्ह्यातील काही वेगळे नाही. रविवारी राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आ. तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरी ते आज मुंबईत अजित पवार यांना भेटले.
त्यामुळे अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला होता. आ. तनपुरे यांचे कार्यकर्ते सांगतात की, तनपुरे यांना अजित पवार यांच्याकडूनच निरोप आला होता. त्यामुळे त्यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर पुन्हा तनपुरे जयंत पाटील यांच्यासोबत दिसून आले. त्यानंतर आ. तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.