कर्जत – महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे ही धनगर समाजाची मागणी आहे. गेल्या 70 ते 75 वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज लढत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणातील त्रुटी दुर करून धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी चोंडी येथे बोलताना केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता.जामखेड) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाचे आंदोलन सुरू आहे. या अंदोलनाला आमदार राम शिंदे यांनी आज 9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, आण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितिन धायगुडे यांची भेट घेतली.
यावेळी आमदार राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, उपसरपंच कल्याण शिंदे, बाबासाहेब शिंदे पाटील, उमेश रोडे, आप्पासाहेब उबाळे उपस्थित होते.
आमदार राम शिंदे म्हणाले की, धनगर समाजाला घटनेतील आरक्षण तातडीने लागू करावं, संसदेच्या विशेष अधिवेशनात हा विषय मार्गी लावावा या मागणीसाठी चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमांतून आरक्षणासाठी आंदोलन होतात त्यामाध्यमांतून धनगर समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला पाहिजे.
धनगर समाजाला गेल्या अनेक दिवसांपासून नुसते अश्वासने दिली जातात अनेक पक्षांचे प्रमुख असतील, नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी धनगर समाजाच्या संदर्भामध्ये अत्तापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हा समाजाचा आक्रोश आहे. त्यामुळे तातडीने धनगर समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे कायदेशीर बाजू त्रुटी आहेत. त्या त्रुटी तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने दुर केल्या पाहिजेत ही धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी आमदार राम शिंदे यांनी केली.