पिंपरी, (प्रतिनिधी) – जग सतत बदलत असताना जागतिक दर्जाचे उत्पादन करण्याचे आव्हान समोर असते. त्यांच्या यशात कुटुंबीयांचे योगदान असते. भारतीय तरुणांना उद्योगात यावेसे वाटते, हे आशादायक चित्र आहे. तर, उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते आहेत, असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेने चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्लस्टर सभागृहात आयोजित केलेल्या जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते.
आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे या वेळी उपस्थित होते.
या वेळी संतोष मेदनकर (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार), शरयू शेटे (उद्योगसखी पुरस्कार), सुरेश भाकरे (कृषिभूषण पुरस्कार), कुणाल पवार (उद्योगमित्र पुरस्कार), सुरेश पठारे (उद्योगभूषण पुरस्कार) यांना प्रदान करून करण्यात आले. मुकुंद पवार यांना विशेष कला सन्मान प्रदान करण्यात आला. वर्षा बालगोपाल यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला. प्रभाकर वाघोले यांनी मानपत्राचे वाचन केले.
सचिन ईटकर, मनोहर पारळकर यांनी मनोगत व्यक्त केले. बाजीराव सातपुते यांनी ‘जे. आर. डी. टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, अरुण गराडे, फुलवती जगताप, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.