- सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने रद्दी महोत्सवाचे आयोजन
पवनानगर – सह्याद्री प्रतिष्ठान मावळ अंतर्गत येणाऱ्या सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने रद्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी रद्दी बरोबरच ई-कचरा देखील स्वीकारणार आहे. सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने रद्दी महोत्सव आयोजित करण्याचे हे 5 वे वर्ष आहे.
रद्दी विका व शाळा शिकवा या घोषवाक्यअंतर्गत विद्यार्थी, शाळा व विविध सामाजिक संस्था यांच्या शैक्षणिक वर्षातील शिल्लक वह्या व त्याची कोरी पाने आदी देणगी स्वरूपात गोळा करण्यात येणार आहे. अनेकांचे नादुरुस्त मोबाईल लॅपटॉप हे कचरा जमा होतात. खराब या वस्तूंचा ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. यासाठी अकादमीच्या वतीने खराब झालेले मोबाईल लॅपटॉप देणगी स्वरुपात घेण्यात येऊन ते दुरूस्तीकरून गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
करोनाच्या काळामध्ये अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेले असून, हातावर पोट असणाऱ्यांना मुलांच्या शिक्षणावर देखील खर्च करणे शक्य होत नाही. एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच या मुलांना शैक्षणिक साहित्य कमतरता जाणवू नये यासाठी सह्याद्री विद्यार्थी अकादमीने 15 मार्च ते 15 एप्रिल असे रद्दी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर रद्दी द्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने आयोजित रद्दी महोत्सवामध्ये जमा झालेल्या वह्या पुस्तकांचे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सह्याद्री विद्यार्थ्यांकडून प्रयत्नशील आहे. आपल्या परिसरातील गरजूंसाठी मदत करायची असल्यास सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा.
– चेतन वाघमारे, संपर्कप्रमुख, सह्याद्री विद्यार्थी अकादमी, महाराष्ट्र राज्य