प्रत्येकाचं आपल्या आजोळाशी एक वेगळंच नातं असतं. तसंच माझंही आहे. तेवढंच मायेचं आणि जिव्हाळ्याचं! मुरलेल्या मुरंब्याची चव जशी दिवसेंदिवस वाढत जाते तसंच आपल्या साठवणीतल्या आठवणीसुद्धा मनात अशा काही मुरतात की, त्या कितीदाही आठवून पाहिल्या तरी चाखाव्याच वाटतात; पण आपलं मन काही भरत नाही! मला आजही आठवतं, लहानपणी सहामाही परीक्षा दिवाळीपूर्वीच असायच्या. कधी एकदा शेवटचा पेपर देतो आणि आई-बाबांबरोबर जामखेडला म्हणजे आजोळी जातो असं वाटायचं. त्यावेळेस लातूरहून 4-5 तास लागायचे पोचायला. पण त्या अख्ख्या प्रवासात खिडकीबाहेर पाहत दिवाळीत काय मौजमजा करायची हेच चित्र मनात रंगवत बसायचो.
बस स्टॅण्डवर उतरताच जवळच असलेल्या सॉमिलवरून आजोबांच्या सायकलवर बॅगा ठेवून रमतगमत माझी पावलं घराच्या दिशेने पडायची. खरं तर घर नाही तो आमचा मोठा वाडा होता. शॉर्टकट म्हणून मागच्या दाराने जायचो. आत प्रवेश केला की समोर दिसायच्या त्या आमच्या सदा हसतमुख असणाऱ्या नानी. वाड्यातलं असच एक दुसरं व्यक्तिमत्त्व म्हणजे आक्का. त्यांना आजही पाहिलं की प्रश्न पडतो, मी अजून लहान आहे की आक्का कधी यापेक्षा वयस्कर झाल्याच नाही? आजही तेवढ्याच ठणठणीत! आणि मग समोर दिसायची ताई म्हणजेच माझी आजी. जवळ घेऊन मायेनं आमच्या तोंडावरून हात फिरवायची आणि मुके घ्यायची. एकेक करत दिवाळीसाठी आलेल्या मामा, मावश्या आणि त्यांच्या मुलांनी वाडा भरून जायचा. आणि मग खरी सुरू व्हायची आमची वाड्यातली दिवाळी!
सुरुवात व्हायची ती दिवाळीसाठी लागणाऱ्या किराणामालाची यादी करण्यापासून. यादी करताना आमच्या फर्माईशी चालूच असायच्या. “आजी, मला डाळीचे लाडू.’ की लगेच दुसरी, “मला तिळाच्या करंज्या आणि अनारसे.’ आणि मग पावशेरच्या ठिकाणी अर्धा आणि अर्धाच्या ठिकाणी एक अशी खाडाखोड करत यादी पूर्ण व्हायची. “सगळ्याला सगळं मिळणार पण लाडू बांधायला सगळ्यांनी बसायचं.’ आजीची ही अट आम्ही हसतहसत मान्य करायचो. कारण गरमागरम लाडू बांधताना तिची नजर चुकवत खाताना मजा यायची. खरं सांगायचं तर आजीपासून चोरी लपून राहत नव्हती पण आम्हा नातवंडांच्या आनंदातच तिला सुख वाटायचं!
रात्री आजोबा कामावरून आले की, फटाक्यांची यादी करताना आमचा तो किलबिलाट ऐकून दिवाळीआधीच फटाके फुटल्यासारखे वाटायचे! लवंगी, भुईचक्र, रॉकेट, पाऊस, उंच जाणारे डबल शॉट, सुतळी बॉम्ब ही यादी मोठ्यांसाठी आणि मग आमच्यासाठी बंदुका, टिकल्या, सापगोळी, फुलबाजी…! “बर पोरांनो, उद्या फटाके आणि कपडे आणायला जाऊ.’ असं म्हणताच आमचा एकच जल्लोष चालू व्हायचा. वाड्यातले सगळेचजण खरेदीसाठी एकत्र बाहेर पडायचे. आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदापुढं कपड्यावरील किमतीचा टॅग मात्र फिका पडायचा!
आमच्यासारखंच आमचा वाडा देखील नटूनथटून मोठ्या दिमाखात दिवाळीचं स्वागत करायला सज्ज असायचा. लाइटवरच्या माळेने संपूर्ण वाडा प्रकाशात उजळून निघायचा. कामठ्यांना एकत्र जोडून आणि त्यावर रंगीबेरंगी घोटीव कागद लावून भला मोठा आकाशकंदील लावला की एक वेगळाच रुबाब वाटायचा! दिवाळीतला प्रत्येक दिवस एक आनंदोत्सव साजरा करण्यात आणि रात्र ढाळजात गोळ्यामेळ्याने जमा होऊन गप्पागोष्टी करण्यात निघून जायची. “चला झोपा आता. उद्या पहिली आंघोळ आहे. पहाटे उठायचंय.’ अशी ऑर्डर आली की, उद्याची स्वप्न पाहत झोप कधी लागायची कळायचंच नाही.
पहिली आंघोळ म्हणून भल्या पहाटे आम्ही खडबडून जागे व्हायचो. थंडीत कुडकुडत बाहेर अंगणात पेटवलेल्या चुलीजवळ हात शेकत बसायचो. त्या मंद अंधारात दरवळणाऱ्या पारिजातकाच्या फुलाच्या सुगंधात भर पडायची ती उटण्याच्या वासाची. “काय रे पोरांनो किती हा मळ अंगावर…’ असं म्हणताना उटणं लावून आंघोळ घालताना आजीची बडबड आणि सूचना दोन्ही एकाच वेळेस सुरू असायच्या. “फटाके एकट्याने उडवायचे नाहीत. मामासोबतच फटाके फोडायचे. आणि जरा जपून. कपडे नवीन आहेत. वगैरे…वगैरे…’
गंमत म्हणून फटाके फोडून झाले की आम्ही फुसके फटाके गोळा करायचो. त्यातली दारू गोळा करून कागदावर टाकायचो आणि तो कागद पेटवून द्यायचो. र्सर्रर्र करत आवाज आला की त्यावेळेस काहीतरी वेगळेच संशोधन केल्यासारखे वाटायचे! आम्ही कितीतरी वेळा तात्यांचे बोलणे खाल्ले होते. “अरे, टिकल्या बंदुकीत घालून उडवा. इथे फाटकाच्या कडीखाली आदळून उडवतात का?’ पण आमचे फटाके उडवण्याची पद्धतच अतरंगी! बॉम्ब नुसता नाही पेटवायचा तर त्यावर उलटा करून तांब्या नाहीतर परसाकडं जाण्याचं टरमाळं ठेवलेलं असायचं! भुईचक्र फिरताना त्याच्यात उभं राहून उड्या मारण्यात आम्हाला भारीच साहस केल्यासारखं वाटायचं!
लक्ष्मीपूजनादिवशीची तयारी तर पाहायलाच नको. अंगणात सडा टाकून रांगोळी काढताना वाड्याला शोभेल अशी एकदम मोठी रांगोळी काढण्यात आमच्या सगळ्या मावश्या पुढे असायच्या. रांगोळीभोवती मांडलेली झेंडूच्या फुलांची आणि पणत्यांची आरास बघतच बसावी असं वाटायचं! आणि मग पूजेची तयारी झाली की सगळ्याजणी नववारी आणि नाकात नथ घालून तयार व्हायच्या. आजी-आजोबा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायला सांगायचे. त्यादिवशी खऱ्या अर्थाने वाडा समृद्ध झाल्यासारखा वाटायचा! भाऊबिजेदिवशी मोठ्यांनी शंभराची नोट ओवाळणी म्हणून टाकली की आम्ही हळूच आमच्या वरच्या खिशात ठेवलेल्या दहा रुपायाकडं पाहायचो आणि वाटायचं आपण कधी मोठे व्हायचो? पण आज दिवाळी आली की वाटतं उगाच मोठे झालो! आजही त्या आठवणींनी डोळ्यात पाणी येतं. आज आमचा वाडा नाही राहिला. तिथं फक्त आता उरलेत कुजलेले लाकडी खांड आणि माती! वाडा सोडून काहीजण दूर राहायला गेलेत तर नानींनी, मोठ्या आईनी आणि भाऊंनी हे जग कधीच सोडलंय. जिवंत आहेत तर त्या फक्त आठवणीच!
अमोल भालेराव