नवी दिल्ली – मोदी सरकारने (Modi Sarkar) जाहीर केलेल्या नोटबंदीच्या (Notbandi) निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाली. यानिमीत्ताने कॉंग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. या संबंधात केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल करताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नोटाबंदीचा निर्णय म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि उपजीविकेवरील सर्वात मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरीक अजूनही या निर्विकार राक्षसी हल्ल्याच्या जखमेवर उपचार करत आहेत,असे खर्गे यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टवर म्हटले आहे. (Congress vs Bjp)
या निर्णयामुळे लाखो छोटे व्यवसाय बंद झाले, नोकऱ्या गेल्या, लोकांची बचत नष्ट झाली, पण आजही भारतीय लोकांना या अघोरी निर्णयाचे नेमके उत्तर सापडलेले नाही. कोट्यवधी लोकांना स्वतःच्या पैशाची वाट पाहत रांगेत का उभे केले गेले?’काळ्या पैशा’चा धोका नाहीसा झाला का, दहशतवादाशी संबंधित घटना थांबल्या का आणि बनावट चलन कमी झाले का? असेही प्रश्न त्यांनी विचारले. अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला परंतु सध्या सन 2016 पेक्षाही अधिक नोटा चलनात आहेत याविषयीही खर्गेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या दिनी मोदी सरकारच्या निर्णयावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, रोजगार नष्ट करणे, कामगारांचे उत्पन्न थांबवणे, छोटे उद्योग संपवणे, शेतकऱ्यांचे नुकसान करणे आणि असंघटित अर्थव्यवस्था मोडीत काढणे यासाठीच हा विचारपूर्वक केलेला कट होता. 1 टक्के भांडवलदारांच्या फायद्यासाठी हा 99 टक्के सामान्य भारतीयांवर हल्ला होता असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
कॉंग्रेस (Congress) सरचिटणीस जयराम रमेश यांनी नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असल्याचे नमूद केले. नोटबंदीचा हा निर्णय म्हणजे मोदी सरकारची अमानुषता आणि आर्थिक निरक्षरता यांच्या अद्वितीय संयोजनाचे प्रतीक आहे असे त्यांनी म्हटले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे भारतात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे परिणाम नष्ट झाले असेही त्यांनी म्हटले आहे. “नोटाबंदी ही एक मोठी घोडचूक होती. त्यातून मोदी सरकारचा एकही उद्देश साध्य झाला नाही.
केंद्राने 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने 1,000 आणि 500 रुपयांच्या चलनी नोटां रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात काळा पैसा बाहेर काढणे, बनावट भारतीय चलनी नोटा नष्ट करणे यासह अनेक उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.