कोल्हापूर – सारथी उपकेंद्रासाठी जाहीर केलेली एक हजार कोटींची रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर द्यावी. कोरोनामुळे रक्कम देण्यास अडचण येत असेल तर ही रक्कम टप्प्याने द्यावी, अशी मागणी आज संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.
दरम्यान, माझा स्वभावच शांत आहे, ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा हे मला नक्की कळतं आणि छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, अशी समजच संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाबाबत राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्या सगळ्या चर्चेला खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी हे वक्तव्य करून पूर्णविराम दिला आहे.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी उपकेंद्रसाठी दिलेली मुदत संपत आली आहे. सरकारने लवकरात लवकर सारथी उपकेंद्रासाठी निधी द्यावा. हे उपकेंद्र सुरू झाल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू. याबाबत सारथी बोर्डाची महत्वाची बैठक 14 जुलै रोजी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सारथी बाबत केलेल्या मागण्या सरकारने लवरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजी राजे छत्रपती यांची आज सारथी संस्थेबाबत चर्चा झाली. या दरम्यान राज्य सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली आहे.