मुंबई- महागाई, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली बेसुमार वाढ यामुळे आगामी काळामध्ये घरांच्या दरामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर महागाईमुळे बॅंकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी भारतातील रिऍल्टी क्षेत्र आता पुनरुज्जीवित झाले आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या मागणीवर फारसा परिणाम होणार नाही असे मत एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी या कालावधीमध्ये घरांच्या मागणीत वाढ झाली होती. त्या तुलनेत यावर्षी सहा मोठ्या शहरांमध्ये आगामी काळात घरांच्या मागणीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. 2021-22 या आर्थिक वर्षात घरांची मागणी 33 ते 38 टक्क्यांनी वाढली होती. या वर्षात घराचे व्याजदर कमी होते. त्याचबरोबर विकसक आपली इन्व्हेंट्री कमी करण्यासाठी घराच्या किंमती कमी करीत होते. त्यामुळे घराची मागणी वाढली होती.
2016 ते 21 दरम्यान घराच्या किमती तुलनेने कमी होत्या. मात्र आता त्यामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही एकूण अर्थव्यवस्थेचा वेग पाहता घरांची मागणी वाढत राहण्याची शक्यता आहे. आगामी काळामध्ये व्याज दर वाढणार असल्यामुळे भांडवलाचा खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना अधिक व्याजावर कर्ज घ्यावे लागणार आहे. बऱ्याच राज्य सरकारनी पुन्हा मुद्रांक शुल्कात वाढ केली आहे. या सर्व बाबीचा आगामी काळात या क्षेत्रावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होणार आहे.
मात्र तरीही मागणी वाढत जाणार असल्यामुळे आगामी वर्षांत घरांच्या दरात सहा ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे क्रीसिल रेटिंगचे संचालक अनिकेत दाणी यांनी सांगितले.करोनाच्या काळामध्ये घर विक्री मंदावल्याने विकासकाकडे साडेतीन ते पाच वर्षे पुरेल एवढा घरांचा साठा होता. मात्र आता इन्व्हेंट्रीची पातळी कमी होऊन दोन ते चार वर्षाची होणार आहे. या क्षेत्रामध्ये एवढी इन्व्हेंटरी सर्वसाधारण समजली जाते.
गेल्या दोन वर्षांमध्ये घरांची मागणी कमी असल्यामुळे आणि नव्या योजना कमी प्रमाणात सुरू झाल्यामुळे इन्व्हेंट्री कमी होण्यास मदत झाली आहे. अगोदर मोठ्या विकासकांचा या क्षेत्रातील वाटा 18 टक्के होता. मात्र जीएसटी आणि रेरामुळे या क्षेत्रातील मोठ्या विकासकांचा वाटा आता वाढून 25 टक्क्यावर गेला आहे. हे विकसक तुलनेने जास्त प्रमाणात भांडवल उभारणी करू शकतात.
……….