मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती बेफाम वाढल्या आहेत. त्याचबरोबर एकूण महागाई वाढत चालल्यामुळे आता ग्राहक बचत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका अहवालात आढळून आले आहे. मात्र काही दिवसानंतर परिस्थिती सुरळीत होईल असेही बऱ्याच ग्राहकांना वाटते.
अर्नेस्ट अँड यंग या कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात या बाबी आढळून आल्या आहेत. जवळ जवळ 80 टक्के ग्राहकांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत आमचा उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नसल्यामुळे आम्ही शक्य तेवढी बचत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळली जात आहे. मात्र ही परिस्थिती एक वर्षाच्या आत सुधारेल असे भारतातील 77 टक्के ग्राहकांना वाटते.
जागतिक पातळीवर हे प्रमाण केवळ 48 टक्के आहे. भारतातील ग्राहकांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आगामी काळात त्या किती वाढतील याची काही शाश्वती नाही. त्यामुळे आवश्यक खर्च सोडला तर इतर खर्चाला आम्ही कात्री लावली आहे. जागतिक पातळीवर रशिया- युक्रेन युद्ध सुरू होण्याअगोदर कच्च्या तेलाच्या किमती 85 डॉलर होत्या. आता त्या जवळजवळ 110 डॉलर झाल्या आहेत.
भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे भारतीयांना या दरवाढीचा सर्वात जास्त फटका बसला आहे. भारताकडे परकीय चलनाचा साठा बराच होता. त्यामुळे आतापर्यंत तरी कच्चे तेल खरेदी करण्यात कसलेही अडथळे आले नाहीत. मात्र परकीय चलनाचा साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या आघाडीवर भारताला विचार करावा लागणार आहे.
भारताच्या तुलनेत श्रीलंका आणि पाकिस्तानची परिस्थिती कच्च्या तेलाच्या आयातीमुळे अतिशय खराब झाली आहे. भारतातील श्रीमंताच्या दैनंदिन खर्चावर मात्र याचा कसलाही परिणाम झाला नाही. श्रीमंत लोक सध्या आरोग्य आणि दर्जेदार खाण्यापिण्यावर अधिक लक्ष देत आहेत. आजारी पडू नये यासाठी त्यांनी सेंद्रिय अन्नधान्य खरेदीवर भर दिला असल्याचे दिसून येते. जर युद्ध लवकर संपले नाही तर भारतीय लोकांच्या क्रयशक्तीवर त्याचा आणखी परिणाम होण्याची शक्यता हे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने व्यक्त केली आहे.