मुंबई – आरक्षणच्या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी जी टीका केली आहे, ती नैराश्यातून करण्यात आलेली टीका आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
सध्या जनआशीर्वाद यात्रेवर असलेले राणे आज येथे पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने ओबीसींच्या बाबतीत घटनादुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले पण आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकीच अजून कायम असल्याने या घटनादुरुस्तीचा कोणालाही लाभ होणार नाही असे पवारांनी म्हटले होते. राणे म्हणाले की, पवार हे प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना या संबंधात सहमती कशी घडवता येईल याचे ज्ञान आहे. त्यांचे काही नेते आता तुरुंगात जाणार आहेत. ते कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकावर मी कधीही टीका केलेली नाही, असेही राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. विरोधकांनी घटनेचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा मागासवर्ग आयोगाचा अहवाल लोकांपुढे आणावा, असे ते म्हणाले.