– अमित डोंगरे
असे म्हणतात की, क्रिकेटमध्ये वशिलेबाजी चालत नाही. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तरच इथे टिकून राहता येते. विक्रमादित्य सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन हे उत्तम उदाहरण आहे. मात्र, वशिलेबाजी क्रिकेटमध्येही वर्षानुवर्षे सुरू आहे हे राजस्थान रॉयल्सच्या रियान परागच्या उदाहरणावरून समोर येते. आता त्याचे काकाच राजस्थान संघाच्या मॅनेजमेंटमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
यात तथ्य किती ते जाणकारच सांगू शकतील. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे त्याने आयपीएल स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी न करताही त्याचे संघातील स्थान हलत नाही. राजस्थानच्या संघात कर्णधारापासून सगळे खेळाडू इतक्या वर्षात बदलले मात्र रियान पराग कायमचाच संघात आहे.
गावसकर यांचा मुलगा जेव्हा क्रिकेटमध्ये आला तेव्हाही हेच बोलले गेले की तो देखील भारतीय संघात स्थान टिकवून ठेवणार. मात्र, तसे घडले नाही कारण त्याच्याकडे वडिलांप्रमाणे दर्जा व गुणवत्ता नव्हती. ती एक ना एक दिवस समोर येणारच होती व ती आली देखील आणि त्यानंतर रोहन पुन्हा संघात दिसलाही नाही. आता हिच वाक्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाबाबत अर्जुनबाबत बोलली जात आहेत.
मुळात त्याच्याकडे सचिनइतकी गुणवत्ता नसेलही; परंतु जर त्याने संमिश्र यश मिळवले तरीही तो किमान रणजी करंडक, आयपीएलसह देशांतर्गत स्पर्धेत खेळत राहील. त्याच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यावरून तरी तसे वाटले. आता पुढे तो कशी कामगिरी करतो त्यावर त्याची कारकीर्द अवलंबून राहणार आहे. मात्र, तशी चिंता रियान परागला नाही. मैदानावर वाद घालणे, आपल्या अहंकारी वर्तनाने टिकेचा धनी बनणे ही कामे तो सर्वतोपरी करत हे फक्त प्रत्यक्ष सामन्यात कामगिरी करत नाही.
तशी क्रिकेटची पार्श्वभूमी त्यालाही लाभली आहे. त्याचे वडील पराग दास हे आसामकडून रणजी करंडक तसेच प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळले आहेत. रियाननेही आसामकडूनच रणजी पदार्पण केले होते. त्याची आई मिठ्ठू या देखील माजी राष्ट्रीय विक्रमवीर जलतरणपटू आहेत.
2017 साली विजय हजारे स्पर्धेत 7 सामन्यांतून रियान परागने 248 धावा केल्या. यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेतही सुरुवातीच्या काळात चमक दाखवली आता मात्र, तो केवळ संघातील 11 खेळाडूंपैकी एक बनून राहिला आहे व नवोदितांची जागा अडवून बसला आहे. निदान पुढील सामन्यात तरी त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या तर संघाचे हित होईल अन्यथा त्याला पुढील मोसमासाठी रीलीज केलेलेच उत्तम ठरेल.