नवी दिल्ली – मणिपुर मध्ये दोन महिलांना नग्न करून त्यांच्यावर जो सामुहिक बलात्कार करण्याचा घृणास्पद प्रकार झाला आहे त्यावरून तप्त झालेले राजकीय वातावण अजूनही शांत झालेले नाही. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत विस्तृत निवेदन करावे अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मणिपुरच्या त्या घटनेबद्दल मोदींच्या मनात खरंच क्रोध असला असता तर त्यांनी त्या घटनेवरून कॉंग्रेसशासित राज्यांशी खोटी तुलना करण्याऐवजी त्यांनी मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांना बरखास्त केले असते असेही त्यांनी म्हटले आहे.
मणिपूरच्या एका गावात दोन महिलांना नग्न करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्याचा आणि जमावाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्याच विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरले आहे. या संबंधात खर्गे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, नरेंद्र मोदीजी, तुम्ही काल संसदेत मणिपुर बाबत कोणतेही निवेदन केले नाही. या घटनेबाबत जर तुमच्या मनात खराच क्रोध असला असता तर त्यावर राजकीय भाष्य करण्याच्या ऐवजी तुम्ही मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांची पदावरून तातडीने हकालपट्टी केली असती.
भारताची अपेक्षा आहे की तुम्ही आज संसदेत सविस्तर विधान कराल, फक्त महिलांच्या बाबतीत घडलेल्या एका घटनेवर नव्हे, तर मणिपुर मध्ये गेली 80 दिवस हिंसाचाराचे जे थैमान सुरू आहे, त्याबाबत तुम्ही बोलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये महिलांना नग्न अवस्थेत परेड केल्याच्या घटनेने 140 कोटी भारतीयांना लाज वाटली असून कायदा पूर्ण ताकदीने काम करेल आणि कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन मोदींनी काल संसदेच्या आवारात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर केले होते.