नवी दिल्ली – कॉंग्रेस (Congress) हे गंजलेले लोखंड आहे, जे पावसात ठेवले तर नष्ट होते. भारताने जे काही साध्य केले ते कॉंग्रेसला आवडत नाही. कॉंग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे. कॉंग्रेसला देशाला 20 व्या शतकात घेऊन जायचे आहे. असा पक्ष ज्या आघाडीत आहे, ते देशाला विकासाच्या मार्गावर कसे नेतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजप (bjp) कार्यकर्त्यांच्या एका बैठकीला मोदी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh chauhan) यांच्या सरकारच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि आगामी निवडणुकीसाठी (pm modi in bhopal) कार्यकर्त्यांना तयार राहायला सांगितले.
मोदी म्हणाले, नारी शक्ती वंदन कायद्या’ने देशाने नवा इतिहास रचला आहे. माता-भगिनी अनेक दशकांपासून वाट पाहत होते, ते शक्य होणार नाही, असे सांगण्यात आले. मोदी असतील तर प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्याची हमी दिली जाते, हे लोकांना आता उमगू लागले आहे.
कॉंग्रेसवर अधिक टीका करताना मोदी पुढे म्हणाले की, तुमच्या पालकांना गरिबीत ठेवण्यास कॉंग्रेस जबाबदार आहे. आज जग भारताबद्दल जे काही म्हणत आहे, या सर्व गौरवशाली गोष्टी याआधीही करता आल्या असत्या. कॉंग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था बनवली. ती फक्त एकाच कुटुंबाचा अभिमान वाढवण्यात गुंतली होती. त्यांनी अशी व्यवस्था निर्माण केली की गरिबांना प्रत्येक गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागले. गरिबांची कोंडी करून कॉंग्रेसला आम्ही गरिबांना काहीतरी दिले आहे, असे म्हणण्याची संधी मिळाली. कॉंग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा या समस्यांत अडकवून ठेवले. कॉंग्रेसच्या राजवटीत तुम्हाला ज्या गोष्टींचा सामना करावा लागला होता, त्याला सामोरे जावे लागू नये यासाठी भाजपचे डबल इंजिन सरकार काम करत आहे.
“इंडिया आघाडी’ महिलाविरोधी
महिला विधेयकाबाबत मोदी म्हणाले की, या विधेयकाला विरोध करणारे “इंडिया आघाडी’चे हे तेच लोक आहेत; ज्यांनी देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रपती होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. अनेक दशके सरकार चालवलल्या कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयक का मंजूर केले नाही? संधी मिळताच माता-भगिनींना फसविण्याचा निर्धार अहंकारी आघाडीच्या लोकांनी केला आहे. आता ते एक नवीन खेळ खेळतील. ते महिला शक्तीचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतील. कारण महिला शक्ती एकसंध नसल्यामुळे ते अफवा पसरवतील. प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला सजग आणि एकजूट राहावे लागेल.
कॉंग्रेस अजूनही तीच जुनी मानसिकता पाळत आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांच्या परिस्थितीने काही फरक पडत नाही. “गरीब की बस्ती’ हे कॉंग्रेस नेत्यांसाठी व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण आहे. शेतकऱ्यांचे शेत हे कॉंग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. कॉंग्रेसने 50 वर्षांपूर्वी गरिबी हटावचा नारा दिला होता. कॉंग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण केले का?
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान