– हेमंत देसाई
तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेथील विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेन्दू अधिकारी यांच्यात नेहमीच वाद रंगत असतो. सध्याचा वाद मात्र विकोपाला गेला आहे.
“ममतादीदींनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता. निवडणूक आयोगाने तृणमूलचा राष्ट्रीय दर्जा हिरावून घेतल्यामुळे त्यांना त्याबाबत अमित शहांची मदत हवी होती’, असा आरोप त्या संदर्भात शुभेन्दू यांनी केला. त्यामुळे संतापलेल्या दीदींनी, “तुमचा आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईस सज्ज राहा’, असा इशारा त्यांना दिला आहे. उलट यापूर्वी दीदींनी अमित शहांच्या विरोधात शेरेबाजी केली असून, त्याविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आपण आहोत, असा इशारा शुभेन्दू यांनी दिला आहे.
शुभेन्दू यांचे वडील शिशिर अधिकारी हे खासदार असून, मनमोहनसिंग सरकारमध्ये ते ग्रामीण विकासमंत्री होते.
शुभेन्दू हे तृणमूलमध्येच होते आणि नंदीग्राममध्ये रासायनिक उद्योगसंकुल उभारण्याच्या विरोधात भूमी उच्छेद प्रतिरोध समितीच्या छत्राखाली जे आंदोलन झाले, त्यामागे शुभेन्दू यांचीच प्रेरणा होती. त्यावेळी शुभेन्दू हे तृणमूलमध्ये होते आणि या आंदोलनाचा फायदा सत्तेवर येण्याच्या दृष्टीने तृणणूलला नक्कीच झाला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शुभेन्दू यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बलाढ्य नेते लक्ष्मण सेठ यांचा 1 लाख 73 हजार मताधिक्याने पराभव केला.
पुढे शुभेन्दू यांचे दीदींशी मतभेद झाले आणि त्यांनी तृणमालच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन 19 डिंसेंबर 2020 रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला लोळवण्याच्या गर्जना करून, केंद्रीय सत्तेच्या बळावर भाजपने सर्व शक्तिनिशी प्रयत्न केले. परंतु पुन्हा तृणमूलचीच सत्ता आली. मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात शुभेन्दू यांनी 1956 मतांनी दीदींचा पराभव केला. मतदान केंद्रात भारनियमनामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली होती आणि हे प्रकरण अद्यापही न्यायालयात आहे. शुभेन्दू हे 1995 साली कोनटाई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, ते कॉंग्रेसच्या तिकिटावर. 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
नंदीग्रामच्या यशस्वी आंदोलनानंतर शुभेन्दू यांना दीदींनी पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया व बांकपुरा जिल्हा मिळून होणाऱ्या जंगलमहल क्षेत्रासाठीचे पक्षनिरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. शुभेन्दू यांनी या जिल्ह्यांमध्ये तृणमूलचा जनाधार वाढवला. 2009 साली शुभेन्दू यांना दीदींनी लोकसभेत पाठवले. त्यावेळी शुभेन्दू यांनी लक्षणीयरीत्या विजय मिळवला होता. दीदीनी त्यांना पक्षात भरपूर वाव दिला होता व त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून शुभेन्दू ओळखले जात होते. परंतु सारडा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 2014 मध्ये शुभेन्दू यांची सीबीआयने उलटतपासणी घेतली होती. या कंपनीचे प्रमुख सुदीप्त सेन यांनी पश्चिम बंगालमधून काश्मीरला पोबारा केला आणि त्यापूर्वी त्यांनी शुभेन्दू यांची भेट घेतल्याचा आरोप होता. तापस यंत्रणांमार्फत दबाव आणून, अन्य पक्षांतील नेत्यांना आयात करण्याच्या तंत्रात भाजप पारंगत आहे. त्याप्रमाणे शुभेन्दू यांना तृणमूलमधून भाजपात आणण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधातील चौकशा थांबल्या. शुभेन्दू यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने दीदींविरुद्ध प्रचार सुरू केला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणेच तृणमूलचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला, हे खेरच आहे. परंतु भविष्यकाळात कष्टपूर्वक यश मिळवल्यास, हा राष्ट्रीय दर्जा पुन्हा प्राप्त करून घेणे अशक्य नाही. शिवाय निवडणूक आयोग ही घटनात्मक स्वायत्त संस्था आहे. तेव्हा अमित शहा निवडणूक आयोगावर दबाव आणून तृणमूलला पुन्हा राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देऊ शकतात, असे शुभेन्दू यांना सुचवायचे आहे का? मात्र जर ममतादीदी माझ्याविरोधात न्यायालयात गेल्या, तर मी बीएसएनएल आणि दूरसंचार प्राधिकरणाकडून मुख्यमंत्र्यांच्या फोन कॉल्सचे रेकॉर्ड मागवेन, असा इशारा शुभेन्दू यांनी दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या कोलकाता भेटीत दंगली कशा घडवायच्या, यासंबंधी बैठक घेऊन चर्चा केली, असा आरोप दीदींनी केल्याचे शुभेन्दू यांनी म्हटले आहे. दीदींनी नेमके काय उद्गार काढले, याची कल्पना नाही. परंतु यापूर्वी दीदींच्या विधानांचा विपर्यस्त अर्थ लावून आरोप करणे हे भाजपकडून सुरूच असते.
2011 नंतर राज्यात तृणमूलला फारशा विरोधास तोंड द्यावे लागले नव्हते. माकप व कॉंग्रेसचा कुठलाही प्रभाव नव्हता. आता मात्र भाजपकडून दमदार विरोध होत असल्यामुळे, ममतादीदी या नर्व्हस झाल्या आहेत. शिवाय भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तृणमूलचे बरेच आमदार तुरुंगात जाणार आहेत, असा किरीट सोमय्या स्टाइल दमही शुभेन्दू यांनी दिला आहे. मात्र अशा दमबाजीला घाबरणाऱ्या दीदी मुळीच नाहीत. त्या अरेला कारे करणाऱ्या नेत्या आहेत. काही वर्षांपूर्वी तृणमूलच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकालाच दीदींनी जेरबंद कले होते. मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात त्यांचा सूर मवाळ झाला असल्याचे बोलले जात होते. अदानी प्रकरणात कॉंग्रेसबरोबर एकसुरात आंदोलन करण्यास तृणमूलने नकार दिला होता. तरीदेखील तृणमूलने भाजपच्या विरोधातल्या भूमिकेस सोडचिट्ठी दिली आहे, असे समजण्याचे मुळात कारण नाही.
राजकारणात कधी कधी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो, तर कधी शांतही राहावे लागते. मोदी सरकारविरोधात लढताना, युक्त्यांचा अवलंब करावा लागतो. तृणमूलची ताकद कमी होत चालली आहे. ममता दीदींचे सरकार भ्रष्ट आहे, असा प्रचार करून त्यांची प्रतिमा कलंकित करण्यासाठीच दीदींनी अमित शहांना फोन केला, असा आरोप केला जात आहे. मात्र शुभेन्दू यांच्या या प्रचार तंत्रास यश मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.