कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातून एन. एच. 160 हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना योग्य मोबदला देण्यात आला. परंतु शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्याबाबत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केलेला पाठपुरावा व शिष्टाईमुळे शासकीय जागेवर राहणाऱ्या 40 नागरिकांना 2 कोटी 2 लाख 56 हजार 598 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते, ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते. त्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या, मात्र त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचण निर्माण झाली. यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील अनेक नागरिकांचा समावेश होता. त्याबाबत या नागरिकांनी आ. काळे यांची भेट घेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे साकडे घातले होते.
आ. काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.160 चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशातून भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांना 2 कोटी 2 लाख 56 हजार मोबदला देण्यात आला आहे. यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील 40 नागरिकांचा समावेश आहे. न्याय मिळवून देवून नागरिकांना भरपाई मिळवून दिल्याबद्दल भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांनी आ. काळे यांचे आभार मानले.
आ. काळेंच्या रूपाने देवच धावला
शासकीय जागेवर वास्तव्यास असल्यामुळे आम्हाला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. ही कैफियत आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला न्याय मिळाला असून त्यांनी आमची व आमच्या कुटुंबाची भविष्यात होणारी परवड थांबवली.आमच्या लेकरा- बाळांचा त्यांना आशीर्वाद मिळणार असून आ. काळेंच्या रूपाने देवच धावून आला, अशी प्रतिक्रिया वंचित प्रकल्पबाधित नागरिकांनी व्यक्त केली.