नवी दिल्ली- तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये 9 डिसेंबर रोजी झटापट झाल्याचे उघड झाले आहे. मात्र त्यात भारताच्या एकाही जवानाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, या विषयावर आता चीनकडूनही निवेदन जारी करण्यात आले आहे. हिंसक घटनांनंतर भारताच्या सीमेवरील स्थिती सामान्य असल्याचे त्यात म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांनी चीनवर टीका केली आहे. ते म्हणाले की सीमेवर जी जैसे थे स्थिती आहे, ती एकतरफी पध्दतीने बदलण्याचा प्रयत्न चीनने केला होता. मात्र तेव्हा झालेल्या झटापटीत भारतीय लष्कराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. लष्कराचा एकही जवान शहीद झालेला नाही.
सीमेवरच्या या संघर्षाच्या बातम्या सोमवारी प्रसारीत झाल्यानंतर भारतात त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही चर्चा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरच्या सध्य स्थितीची यावेळी संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली.
चीनची जुनीच खोड
चीनकडून यापूर्वीही भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले आहेत. आताच्या तवांग घटनेच्या अगोदर गलवान भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळीही उभय देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात काहीशी कटुता आणि अलिप्तताही आली होती. चीनने आता पुन्हा एकदा आगळिक करण्याचा प्रयत्न केला आहे. सीमेवर गडबड करण्याचा चीनचा इतिहास जुनाच आहे. 1962, 1967, 1975, 2020 आणि 2022 या वर्षांत सीमेवर भारत आणि चीनच्या लष्करात संघर्ष झाला आहे.