भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज ईशान किशनने ( Ishan Kishan ) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने द्विशतक ठोकले आणि सर्वांच्यात चर्चेत ईशान किशनचा उल्लेख होऊ लागला. त्याच्या या जबरदस्त खेळीबाबत अनेकांनी त्याचे जोरदार कौतुक देखील केले आहे. त्याच सामन्यात विराट कोहलीनेही बऱ्याच काळानंतर आपले एकदिवसीय शतक साकार केले. सामन्यानंतर आपल्या द्विशतकाबाबत बोलताना ईशान किशनने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे.
#INDvAUS 2nd T20 : भारतीय महिलांचा ‘सुपर’ विजय, मालिकेतही बरोबरी
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने ( Ishan Kishan ) शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजीस येऊन चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने या सामन्यात १३१ चेंडूमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत २१० धावा केल्या. ईशान किशनने सुरूवातीला ८५ चेंडूत आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावले. शतक झाल्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला आणि अवघ्या १२६ चेंडूत सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. या सामन्यात त्याने २१० धावांच्या खेळीदरम्यान २४ चौकार आणि १० षटकार फटकावले.
सामन्यानंतर द्विशतकाबाबत बोलताना ईशान किशन ( Ishan Kishan ) म्हणाला की,”जेव्हा मी १९७ धावांवर होतो तेव्हा मला वाटले होते की, मुस्तफिझूर हळू चेंडू टाकेल आणि मी पुढे जाऊन त्याला षटकार मारेन. पण मला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि मला ती गमावायची नव्हती. म्हणूनच मी विराट भैय्याला म्हणालो की, तुम्ही मला सिंगल घे, सिंगल घे असे सांगत रहा, नाहीतर मी चेंडूला हवेत मारेल. ते मला फक्त एकच धाव घ्यायची अशी आठवण करून देत होते. द्विशतक झाल्यानंतर त्या आनंदात कोण कुठे आहे याचे काहीच भान मला राहिले नाही. विराट भैय्या माझ्या मागून येत होते आणि म्हणाले की, बॅट माझ्यावर मारू नका फक्त.”
ईशान किशन ( Ishan Kishan ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतक झळकावण्याचे काम केले होते. त्यामुळे ईशान किशन देखील या दिग्गज खेळाडुंच्या यादीत सहभागी झाला आहे.