नगर- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत 9 ते 30 ऑगस्टदरम्यान सर्व पंचायत समिती आणि ब्लॉकस्तरावर मेरी मिट्टी- मेरा देश’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सांगता दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणार आहे. कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्य पथावर नेली जाणार आहे.
तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे. 16 ते 25 ऑगस्ट या कालावधीत शहरी भागात कार्यक्रम, स्वयंसेवक ब्लॉकस्तरावर जाऊन गावोगावी माती गोळा करुन ती दि. 25 ऑगस्टपर्यंत ठराविक ठिकाणी जमा करणार आहेत. दि. 27 ऑगस्टपर्यंत ही माती दिल्लीत कर्तव्यपथावर नेण्यात येणार आहे. दि. 30 ऑगस्टला कर्तव्य पथावर समारोप समारंभ होणार आहे.
ग्रामीण भागात दि. 9 ते 15 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांत स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जाणार आहे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार होईल. सैन्य आणि पॅरा लष्कराशी निगडित लोकांचा सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर अमृत सरोवराच्या काठी किंवा गावातील शिलालेखांवर त्यांची नावे लिहून पंचायत इमारत व शाळेत बसवण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे.
जिल्हास्तरावरही अमृतवाटीका
जिल्ह्यातील प्रत्येक गावातून जमा होणाऱ्या मातीमधून जिल्हास्तरावर देखील अमृतवाटीका बाग उभारण्याचा मानस असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी स्पष्ट केले.