रत्नागिरी – आम्ही केलेले बंड हे सत्तेसाठी नाही तर तत्वासाठी केले. दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या सरकारनंतर मी राज्यभर दौरे केले. यावेळी मला सर्वांनीच भरभरून साथ दिली. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरत आहे. कोकणी माणसांनी बाळासाहेबांवर, शिवसेनेवर खूप प्रेम केले, त्याची मला जाणीव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाची आज सोमवारपासून रत्नागिरीतून सुरूवात झाली आहे. यावेळी आयोजित सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई, ठाणे हे शिवसेनचे शरीर जरी असले तरीसुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे शिवसेनेची दोन फुफ्फूस आहेत. म्हणूनच शिवसेना कोकणात वाढली. शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला आहे. जेव्हा बाळासाहेबांची भूमिका, त्यांचे विचार, निवडणूकपूर्व काळातील युतीधर्म या सगळ्यांचा विचार करून आम्ही निर्णय घेतला.
आमची भूमिका चुकीची असती, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असते. ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्याचे आम्ही पालन केले. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही जेव्हा बंड केले तेव्हा 50 कोटींची मागणी केली, त्यांना बाळासाहेब नकोत. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, त्यांना पैसे हवेत. मी क्षणाचाही विचार न करता 50 कोटी देण्याचा निर्णय घेतला, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केला.