नवी दिल्ली- आप सरकारने सरकारी शाळांमध्ये सुधारणा करून दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेतील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी केली आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर येत्या पाच ते सात वर्षात दिल्ली महापालिकांच्याही सर्व शाळांचा पुनर्विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. लिबासपूर गावात सर्वोदय शाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.दिल्लीतील खाजगी सर्वोदय शाळेतील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि हॉल खूप चांगले आहेत, असे ते म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की, पूर्वी दिल्लीतील सरकारी शाळांची अवस्था भयानक होती. तंबूत वर्ग भरवले गेले, अनेक शाळांचे छत तुटले होते, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. गरीब कुटुंबांना त्यांच्या मुलांना अशा शाळांमध्ये पाठवण्याची सक्ती करण्यात आली होती, परंतु आप सरकारने या शाळांमध्ये कमालीची सुधारणा करून दिल्लीच्या शिक्षणातील श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांमधील दरी कमी केली, असे केजरीवाल म्हणाले.
आम्ही आता एमसीडी शाळांचा पुनर्विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील. असे लोक आहेत ज्यांना चांगले शिक्षण मिळाले आहे, परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही, आम्ही त्या मुद्द्यावरही लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही नोकरीच्या संधी निर्माण करण्याला प्राधान्य देऊ, असेही केजरीवालांनी यावेळी नमूद केले.