नवी दिल्ली – भारताशी विनाकारण तणाव निर्माण केल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Canadian Prime Minister Justin Trudeau) त्यांच्या स्वत:च्याच देशात अडचणीत आले असून त्यांची कोंडी होण्यास सुरूवात झाली आहे. कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार धोरण ठरवणारे आणि अन्य विभागही ट्रुडो यांना आता लक्ष्य करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
भारतात काही दिवसांपूर्वी झालेली जी 20 शिखर परिषद ऐतिहासिक ठरली होती आणि जगातील सर्वच प्रमुख देशांनी यशस्वी आयोजनाबद्दल भारताची प्रशंसा केली. त्या परिषदेतून एक लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची जगाला नव्याने ओळख झाली. भारतात या परिषदेत ट्रुडोही सहभागी झाले होते आणि त्यांची येथील वर्तणूकही आता माध्यमांसमोर येते आहे. त्यामुळे ट्रुडो त्यांच्याच देशात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत व तेथील माध्यमांकडून त्यांना प्रश्नांची विचारणा केली जाते आहे.
काही प्रमुख माध्यमांनी तर त्यांच्या अनावश्यक वर्तणुकीबद्दल त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करून टाकली आहे. भारताशी दावा मांडणारे आणि भारताचे उघड शत्रु असलेल्या खलिस्तानवाद्यांचे संरक्षक अशी ट्रुडो यांची प्रतिमा माध्यमांतून उभी करण्यात आली आहे. ट्रुडो यांना भारताशी उघड संघर्षाचा पवित्रा घेण्याची मुळात वेळच का आली याचीही चर्चा यानिमित्ताने होते आहे व त्याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे.
खलिस्तान समर्थकांमुळे आहे सरकार
कॅनडात खलिस्तान समर्थक जगमित सिंह यांच्या एनडीपी पक्षाने ट्रुडो यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांचे 24 सदस्य असून या पाठिंब्यावर ट्रुडो सरकार तग धरून आहे. जर जगमित यांनी पाठिंबा काढून घेतला तर संख्याबळानुसार ट्रुडो सरकार कोसळणे निश्चित आहे. कॅनडात गेल्या वर्षी निवडणुका झाल्या होत्या. त्यात ट्रुडोंच्या पक्षाला 158 जागा मिळाल्या होत्या. 338 सदस्यसंख्या असलेल्या कॅनडाच्या संसदेत बहुमतासाठी 170 जागांची आवश्यकता असते.
सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जगमित सिंग यांच्या एनडीपी पक्षाचा पाठिंबा घेतला. जगमित हे भारताचे हितचिंतक नाहीत आणि कॅनडातील खलिस्तानवाद्यांचे ते ब्रॅंड अम्बेसेडर आहेत. त्यांची भारतविरोधी प्रतिमा विख्यात आहे. अलिकडेच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या विरोधात विखारी वक्तव्य केले होते. हा सगळा कॅनडा सरकारच्या स्थैर्याचा प्रश्न पाहता कॅनडात खलिस्तानवाद्यांना मिळत असलेले संरक्षण आणि त्या अनुशंगाने ट्रुडो यांनी केलेली विधाने हा सगळा घटनाक्रम स्पष्ट होतो.