चिंबळी – निघोजे (ता. खेड) येथील गावात महावितरण कंपनीचा गैरकारभार सुरू असून गेले वर्षभरापासून येथील वीजबिलांचे गठ्ठे चक्का ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यात फेकून दिले जात आहेत. ग्राहकांना कचऱ्यात कागद शोधल्यासारख वीजबील शोधत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. शिवाय बील वेळेत सापडत आणि मिळत नसल्याने ते भरण्यास देखील उशीर होत असल्याने ग्राहकांना दंडाचा सामना करावा लागत आहे.
घरोघर बील मिळत असल्याने वर्षभरापूर्वी ग्राहक वेळेवर बील भरणा करत होते. शिवाय बील गहाळ होण्याचा देखील प्रश्न भेडसावत नव्हता. हल्ली महावितरण निष्काळजीपणे बिले ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकत असून या बिलांना कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे बिले चोरीला जाण्याचे देखील प्रकार घडत असून या सर्व प्रकाराबाबत वीज ग्राहक नाराजी व्यक्त करत आहे. शिवाय या भागात बील भरले नाही म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित केला जात असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.
त्याप्रमाणे चिंबळी परिसरात ही विज बिले ग्राहकांना मिळत नसून रोज सकाळी किंवा सायंकाळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून ही या गोष्टी कडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चिंबळी येथील विज ग्राहकांना विज बिले काढण्यासाठी चाकण येथील विज कार्यालयात जावे लागत असून या ठिकाणी ही वेळेत बिले ग्राहकांना मिळत नाही.
“महावितरणने घरपोच वीज बील पोहचावे अन्यथा बील भरण्यावर सामूहिकरित्या ग्रामस्थ बहिष्कार घालतील. तसेच वीज जोड खंडित करू दिले जाणार नाही.”
– आशिष येळवंडे, अध्यक्ष, सरपंच परिषद
“निघोजे येथील वीजबिले वाटप होत नसल्याची माहिती घेऊन व पाहणी करून ताबडतोब समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून ग्राहकांना वेळेवर व घरपोच बिले यांची काळजी घेतली जाणार आहे.”
– संदीप धारमवार, उपअधिकारी, महावितरण, खेड-चाकण