पळसदेव, (वार्ताहर)- पळसदेव भागातील शेलारपट्टा व भावडी गावाच्या लगत असलेल्या भावडी ओढ्यावर शेलारपट्टा, माळेवाडी, भावडी, लोणी देवकर, चांडगाव गावातील पाचशे ते सहाशे शेतकर्यांचे सुमारे सातशे ते आठशे विद्युत पंप आहेत. या विद्युत पंपाच्या साह्याने या पाच गावांतील दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. त्यामुळे भावडीचा ओढा हा या पाच गावाला संजीवनी ठरणार आहे.
दर वर्षी उन्हाळ्यात धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर या ओढ्यातील पाणी अगदी नदी पात्रात जाते त्यामुळे या भागातील शेतकर्यांना दर वर्षी उन्हाळ्यात विद्युत पंपापर्यंत पाणी नेण्यासाठी पाईप व केवळ वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर काहींनी या ओढ्यात लाखो रुपये खर्च करून चारी काढून विद्युत पंपापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये शेतकर्यांचे दर वर्षी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान थांबवण्यासाठी या भागात भावडी ओढ्यावर मुख्य नदी पात्राच्या काही अंतरावर भगवान घाडगे यांच्या शेताच्या लगत ओढ्यावर बुडीत बंधारा बांधण्यात यावा, यामुळे या भागात या बंधार्यामुळे पाणी साठून राहील व उन्हाळ्यात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होईल.
शिवाय नव्याने जमीन संपादनाचा देखील प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच किमान अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी ओढ्याच्या पात्रात साठून राहील. हेच साठून राहिलेले पाणी विद्युत पंपाच्या साह्याने उचलून शेतीला देण्यासाठी उपलब्ध राहील. या ओढ्यामुळे या भागातील शेतकर्याचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. या भागातील शेतकर्याला बारमाही शेती करण्यासाठी या बुडीत बांधार्याचा उपयोग होणार आहे.
भावडी ओढ्यावर दोन्ही बाजूने साधारणतः पन्नास ते साठ विद्युत रोहित्र बसवण्यात आले आहेत. पाण्याची पातळी अधिक कमी झाल्यावर शेतकर्यांना एक ऐवजी दोन तीन विद्युत पंप बसवावे लागतात.
एकाच ठिकाणी अनेक पंप असल्याने मोठा गोंधळ निर्माण होतो. यामुळे अनेकवेळा विद्युत पंप, केबल, पाईप इतर साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे येथे शेतकर्यांमध्ये मोठे वाद निर्माण होतात. सततच्या अशा घटनांमुळे शेतकरी चार महिने पुरता वैतागून जातो. त्यामुळे दर वर्षी हाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्रासलेल्या येथील शेतकर्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
तीन वर्षांपूर्वीच मागणी
या पाच गावातील शेतकर्यांच्या हितासाठी तातडीने येथे बुडीत बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ऑक्टोबर 2021 मध्येच येथील शेतकर्यांनी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र अद्याप तरी या बाबत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. तरी लवकरात लवकर भावडी ओढ्यावर बुडीत बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.