मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचे सुपूत्र नील सोमय्या या दोघांचाही जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तेव्हापासून सोमय्या हे नॉट रिचेबल आहेत. अटके पासून सुटका मिळण्यासाठी सोमय्या अज्ञातवासात गेले असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. असे असताना किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील निवासी कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर “भाग सोमय्या भाग” अशी वाक्य अज्ञात व्यक्तींनी लिहिली आहेत. पोलीसांनी हे कृत करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी हा संदेश लिहून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सोमय्या यांच्या कार्यालयाबाहेरच्या रस्त्यावर ‘भाग सोमय्या भाग’ असा संदेश लिहण्यात आला आहे. ही बाब सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. तेव्हा पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी रस्त्याच्या या भागात पांढरा रंग मारून हा संदेश खोडण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. नवघर पोलिसांकडून सध्या हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. ऐरवी विरोधी पक्षातील नेत्यांचे भ्रष्टाचार उखरून काढणारे सोमय्या यांना अटक होण्याच्या भीतीने अज्ञातवासात जाण्याची वेळ आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याकडून या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेल्यास सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मात्र सोमय्यांचा ठावठिकाणा राज्याच्या गृह विभागाला माहीत नाही. तशी माहिती गृह विभागानं स्वत:चं दिली आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही. सध्या पोलीस सोमय्या पिता पुत्रांचा शोध घेत आहेत.