मंचर – महाराष्ट्रातील 40 तालुके दुष्काळग्रस्त निकषात बसले असून, इतरही काही तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यासाठी मंत्रीय कमिटी स्थापन करून सर्कलनुसार सर्व्हे करण्यात आला आहे. राज्यातील 959 सर्कलमधील गावांना दुष्काळी योजनेचा लाभ सरकार देणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (दि. 11) दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे प्रसार माध्यमाशी संवाद साधताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तालुका राष्ट्रवादी प्रमुख विष्णूकाका हिंगे, पक्षाचे कार्याध्यक्ष नीलेश थोरात, शरद बॅंकेचे संचालक अजय घुले, दत्ता थोरात, दौलत लोखंडे, भीमाशंकरचे संचालक रामहरी पोंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील म्हणाले, सरकारच्या मंत्रीय कमिटीच्या सर्वेनुसार 959 सर्कल दुष्काळी जाहीर करण्यात आले असून या सर्कलमधील गावांना दुष्काळी योजनांचा लाभ मिळणार आहे.
या सवलतींचा लाभ
- जमीन महसुलात सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट
- शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकरचा वापर
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
“आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले असून, याबाबत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले असून आदिवासी बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.” – दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री