सातारा – 2024 सालापर्यंत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट आहे. निर्यातक्षम अर्थव्यवस्थेसाठी सातारा जिल्ह्यातील युवकांनी उद्योजक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
नक्षत्र, उदयनराजे मित्रसमूह आणि भाजप जिल्हा उद्योग आघाडी यांच्यावतीने “सातारा उद्योग परिषद 2023′ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खा. उदयनराजे भोसले, खा. संजयकाका पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, माजी आमदार संजय भेगडे, डॉ. दिलीप येळगावकर, मदन भोसले, आनंदराव पाटील, भगवानराव साळुंखे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सातारा विकास आघाडीचे निशांत पाटील, रवी साळुंखे, मनोज शेंडे, प्रदीप पेटकर, भरत पाटील, विजय भिलारे, विक्रमबाबा पाटणकर, पुरुषोत्तम जाधव, धैर्यशील कदम, जयवंत पवार, किरण बर्गे, अनुप सूर्यवंशी, रामकृष्ण वेताळ, राजेंद्र यादव, सुनील खत्री उपस्थित होते.
राणे म्हणाले, शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर उद्योजकांना अधिक वाटतात. याचे कारण म्हणजे, आपल्याकडे पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आपल्याला विजेचा दर जास्त द्यावा लागतो. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाख आहे. त्या तुलनेत उद्योजक किती, याचा विचार होणे गरजेचे आहे. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पश्चिम महाराष्ट्रात व्यवसायांना पूरक सुविधा विकसित झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण 78 टक्के आहे. येथे कोणत्या पायाभूत सुविधा हव्यात हे सांगणे गरजेचे आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी लघु व सूक्ष्म उद्योग विभागाच्या माध्यमातून कर्ज दिले जाईल. साताऱ्यात खाजगी जागेवर उद्योगाची घोषणा केली, तर केंद्र सरकारकडून त्या प्रकल्पाला सहकार्य मिळेल.
भागवत कराड म्हणाले, भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशाचा जीडीपी 12 टक्के आहे. नवोद्योजकांना वित्त पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत, म्हणून पश्चिम महाराष्ट्रात विविध बॅंकांच्या 78 शाखा उघडण्याची सूचना केली आहे. केंद्र शासनाच्या योजना व सवलतींचा लाभ सातारच्या उद्योजकांना मिळण्याकरिता उद्योग परिषदेचे व्यासपीठ उपलब्ध आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले. “मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी लघु उद्योजकांच्या समस्यांचे निवेदन राणे यांना दिले. सातारचे प्रसिद्ध उद्योजक फरोख कूपर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बारा उद्योजकांना “उद्यमतारा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. भाजप उद्योग आघाडीच्या अमोल सणस यांनी प्रास्ताविक केले.