पुणे – रामनदीबाबत जनजागृतीसाठी “रामनदी शाळा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. रामनदीच्या काठावरील सुमारे 25 शाळांत पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांतील भिंतीवर जनजागृतीपर चित्रे रेखाटली आहेत.
किर्लोस्कर कंपनी आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने रामनदी पुनरूज्जीवन अभियानांतर्गत “रामनदी शाळा प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत 20 शाळांतील भिंतीवर चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रामनदीच्या पुनरूज्जीवनाचा, स्वच्छतेचा संदेश भित्तीचित्रांव्दारे पाहता येणार आहे. ही चित्रे दीपक शिंदे आणि 10 कलाकारांनी रेखाटली असल्याची माहिती रामनदी पुनरूज्जीवन अभियानाचे वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड यांनी दिली.
औंध, बाणेर, बावधन, पाषाण या परिसरातील पालिकेच्या 12 शाळांसह बालाजी मुरकुटे विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, चेतन दत्ताजी गायकवाड, पेरिविंकल आदी सुमारे 20 शाळांमधील 40 भिंती चित्रांनी रंगल्या आहेत. यात प्रदूषण, अतिक्रमण, सांडपाणी आदी समस्यांनी वेढलेली रामनदी दाखवली आहे. तर उर्वरित भागात नदीची स्वच्छता करताना, झाडे लावतांना, जलचरांना संरक्षण देताना विद्यार्थी दाखवले आहेत.
दुर्लक्षित रामनदीची ओळख नदीकाठच्या शाळांतील मुलांना, शिक्षकांना झाली पाहिजे. यातून प्रेरणा घेऊन नदी पुनरूज्जीवनासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. शाळेतील मुलांना रामनदीच्या स्वच्छतेचा मंत्र पटल्यास ते कुटुंबातील अन्य सदस्यांना या कामात सहभागी करून घेतील, अशी खात्री असल्याचे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.
गेली अनेक वर्षे आम्ही शालेय मुलांमध्ये पर्यावरण जागृतीचे काम करत आहोत. रामनदी काठच्या शालेय विद्यार्थ्यांना नदी, तिचे आरोग्य, पर्यावरण रक्षणाचे महत्व या प्रकल्पामधून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. “नदी अस्वच्छच होणार नाही’, यासाठी उद्याचे नागरिक जागृत असतील याचा विश्वास वाटत असल्याचे किर्लोस्कर कंपनीचे डॉ. सुरेश मिजार यांनी सांगितले.