इम्रान सरकारने अनेक वृत्तपत्र मालकांना तुरुंगात टाकले असून, सरकारवर बरसणाऱ्या पत्रकारांना काढून टाका, असे दडपण मालकांवर आणले आहे.
रशिया विरुद्ध युक्रेन या संघर्षात, रशियाचे समर्थन करण्यासाठी पुढे येणारा पहिला देश म्हणजे पाकिस्तान. युद्ध सुरू असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. रशियाकडून वीस लाख टन गहू, तसेच लक्षणीय प्रमाणात नैसर्गिक वायू पाकिस्तान आयात करणार आहे. यासंबंधीच्या करारावर इम्रान व पुतीन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी काश्मीर समस्येचे शांततापूर्ण निराकरण करण्याची आवश्यकता आहे, असे मत पुतीन यांच्याजवळ व्यक्त करून इम्रान यांनी भारताची कुरापत काढलीच. मात्र, लोकशाही आणि मानवी हक्काच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा वारंवार घोटला जात असतो.
पाक सरकारने नुकताच एक आदेश काढला असून, त्यात सरकारी अधिकाऱ्यांना टीकेपासून विशेष संरक्षणाची ढाल पुरवण्यात आली आहे. या नव्या तरतुदीमुळे, “फेक न्यूज आणि वाईट माध्यमांना लगाम घातला जाईल. मात्र, याच्या परिणामी चांगल्या माध्यमांना कोणताही धोका पोहोचवला जाणार नाही’, असे इम्रान यांनी म्हटले आहे. इम्रान सरकारने अनेक वृत्तपत्र मालकांना तुरुंगात टाकले असून, सरकारवर बरसणाऱ्या पत्रकारांना काढून टाका, असे दडपण मालकांवर आणले आहे.
जी वृत्तपत्रे वा चॅनेल्स वा वेबसाइट्स सरकारच्या धोरणांवर टीका करतात, त्यांच्या जाहिराती बंद केल्या जातात. तरीदेखील, आपण चांगल्या पत्रकारितेचा आदर करतो अशी शेखी इम्रान मिरवत असतात. पाकिस्तान इलेक्टॉनिक्स क्राइम्स ऍक्ट (पीईसीए) दुरुस्ती कायद्यात असे म्हटले आहे की, कोणत्याही सरकारी संस्थेवर टीकात्मक लिहिणे वा बोलणे, हे गुन्हेगारी कृत्य असेल. दोषी व्यक्तीस पूर्वी तीन वर्षांची शिक्षा होती, ती आता पाच वर्षांची करण्यात आली आहे.
ऍम्नेस्टी इंटरनॅशनल व ह्यूमन राइट्स वॉच या संघटनांनी पत्रकार व सामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क चिरडणारा हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या कायद्याविरुद्ध पाकिस्तानातील माध्यम संस्थांनी संयुक्त कृती समिती स्थापन केली असून, विरोधी पक्षदेखील त्यांच्याबरोबर आहे. पीईसीए कायद्यातील दुरुस्तीसंबंधी अर्ज इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. त्यासंबंधीच्या सुनावणीच्या वेळी या कायद्याबाबत सल्लागारांनी पंतप्रधानांची दिशाभूल केलेली असावी, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. परंतु हे एकप्रकारे पंतप्रधानांचे समर्थनच केले गेले. वास्तविक यासंबंधी संसदेत चर्चा होणे आवश्यक होते. परंतु इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचा त्यावर विश्वास नसावा.
पीटीआयचे अनेक मंत्री सातत्याने पत्रकारांना लाखोली वाहत असतात. आता पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी पीईसीए कायदा मागे घेण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात संयुक्त कृती समितीने एक प्रस्ताव द्यावा आणि त्यातील शिफारअी आम्ही मान्य करू, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील अनेक विरोधक व काही पत्रकार अचानकपणे बेपत्ता होतात.
मात्र यासंबंधीचे खोटे दावे करण्यात आल्यास किंवा सरकारी अधिकारी वा संस्थांबद्दल चुकीची माहिती प्रसृत केल्यास, अशा व्यक्तीस अटक करण्याची तरतूद आहे. त्याला जामीनदेखील मिळणार नाही. आता हे दावे खरे की खोटे, हेदेखील सरकारच तर ठरवणार. खासकरून, पकिस्तानात बलुच व पख्तून नागरिकांच्या अधिकाऱ्यांचे सातत्याने हनन होत असते. वझिरिस्तानातून संसदेत निवडून गेलेले अली वझीर यांना देशद्रोहाच्या आरोपावरून असेच तुरुंगात टाकण्यात आले आहे.
कायदे आझम विद्यापीठातील काही बलुच विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी गेल्या आठवड्यात इस्लामाबादेत विद्यार्थी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी बदडून काढले. त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात प्रकरणे दाखल न करता, परस्पर एन्काउंटर करण्याचे प्रकारही घडत आहेत. गेल्यावर्षी इस्लामाबाद येथे नॅशनल प्रेस क्लबच्या बाहेर एका निदर्शनात प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी पाक लष्कर व आयएसआयवर तुफान टीका केली.
त्यानंतर लगेच जिओ न्यूजच्या व्यवस्थापनाने “कॅपिटल टॉक’ हा हमीद यांचा कार्यक्रम बंद केला. मानवी हक्कांची गळचेपी करणाऱ्या पाक लष्करावर तुटून पडणाऱ्या असद अली तूर या वार्ताहराला मागच्याच वर्षी घरात घुसून जबर मारहाण करण्यात आली. हे आयएसआयचेच कृत्य होते. असरार आलम या पत्रकारावर इस्लामाबादमध्ये गोळीबार करण्यात आला. तर प्रसिद्ध टीव्ही अँकर मतिउल्लाह जान यांना पळवून कोठडीत डांबून, सडकून काढण्यात आले.हे सगळे पत्रकार लष्कराचे प्यादे बनलेल्या इम्रान यांच्यावर हल्ला चढवणारे आहेत.
आठ वर्षांपूर्वी हमीद मीर यांनी बलुचिस्तानच्या संदर्भातील तत्कालीन पाक सरकारच्या धोरणावर टीका केली. अर्थातच लष्कर व आयएसआयलाही त्यांनी सोडले नव्हते. त्यावेळी कराची विमानतळावरून जिओच्या स्टुडिओत जाताना हमीद यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न झाला. त्यांची पत्नी व मुलगी यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या.
इम्रान राजवटीत तर एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भजन गायचे आणि दुसरीकडे दहशतवाद माजवायचा, हे उघड उघड सुरू आहे. “रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर’ ही संस्था माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक दरवर्षी प्रसिद्ध करते. तिच्या अहवालानुसार, जगातील 180 राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा नंबर याबाबतीत 145वा आहे. या संदर्भात भारतातही आनंदीआनंद असला, तरी पाकिस्तानात दरवर्षी आठ ते दहा पत्रकारांची हत्या होते आणि पाक लष्कर व आयएसआय बेछूटपणे काळ्या कारवाया करण्याबाबत जगद्विख्यात आहेत.
त्यातुलनेत भारतात या संदर्भातील परिस्थिती तुलनेने कमी गंभीर आहे. इम्रान खान हे लोकप्रिय क्रिकेटपटू होते आणि पेज थ्री आणि पंचतारांकित वर्तुळात त्यांची उठबस असे. मात्र देखण्या इम्रान यांचा खरा चेहरा अत्यंत क्रूर आहे, असा निष्कर्ष काढणे भाग आहे.
हेमंत देसाई