बिजापूर – नक्षलवाद्यांनी एका मतिमंद व्यक्तीची हत्या करण्याची घटना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात घडली. हा व्यक्ती म्हणजे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेमंत बंडी असे या मतिमंद व्यक्तीचे नाव आहे. राजधानी रायपूरपासून 400 किलोमीट अंतरावर बसागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिमापूर गावात माओवाद्यांच्या गटाने शनिवारी रात्री बंडी याला ओढत घराबाहेर आणले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रविवारी सकाळी घटनास्थळी रवाना झाले. मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.
बंडी याने 2018 मध्ये जालेल्या चकमकीपूर्वी पोलिसांना नक्षलवाद्यांबद्दलची माहिती कळवली होती असा दावा नक्षलवाद्यांकडून करण्यात आला होता. बंडी हा गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. तो नेहमीच घरी एकटाच असे. त्याचा आणि पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नक्षलवाद्यांच्या शोदासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.