पुलवामानंतर प्रथमच पाकचे खेळाडू भारतात
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तानचे क्रीडापटू भारतात येत आहेत. आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना भारतात होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. ही स्पर्धा आजपासून सुरू होत आहे.
दरम्यान, करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या स्पर्धेतून चीनने सहभाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे सहसचिव विनोद तोमर यांनी पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंचा व्हिसा मंजूर झाल्याचे सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या कुस्ती संघटनांनी या स्पर्धेतील सहभागाबाबत नकार दर्शविला होता, मात्र, त्यानंतर दोन्ही देशांनी भूमिका बदलली व त्यामुळे पाकिस्तानच्या मल्लांचा भारतातील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारकडून त्यांना व्हिसा मंजूर झाला आहे. चीनच्या मल्लांचा सहभाग सोमवारी निश्चित होणार असल्याचे राष्ट्रीय कुस्ती संघटनेकडून रविवारी स्पष्ट करण्यात आले होते. ही स्पर्धा येथे 18 ते 23 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
या स्पर्धेत पाकिस्तानचे चार मल्ल सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह एक प्रशिक्षक आणि एक रेफ्रीही असेल. यात महंमद बिलाल (57 किलो), अब्दुल रेहमान (74 किलो), तयाब रझा (97 किलो) आणि झमन अन्वर (125 किलो) हे मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना भारताने व्हिसा नाकारला असता, तर जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवर बंदी लावली जाण्याची शक्यता होती. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा जवळ असल्याने भारताला आपल्या निर्णयाचा फटका बसला असता.